देशात मानसिक आरोग्याबाबत जगजागृतीचा अभाव; कोरोनामुळे रुग्णांमध्ये मोठी वाढ

देशात मानसिक आरोग्याबाबत जगजागृतीचा अभाव; कोरोनामुळे रुग्णांमध्ये मोठी वाढ

मुंबई  ः कोरोना महामारीमध्ये मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दर वर्षी 10 ऑक्‍टोबर या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. दुर्दैवाने भारतात मानसिक स्वास्थ्याबद्दल नागरिकांमध्ये अद्यापही पुरेशी जागरुकता झालेली नाही. 

गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, तसेच जीवघेण्या स्पर्धेमुळे ताणतणाव वाढले आहेत. अगदी लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत, चार भिंतीत वावरणाऱ्या गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत तणावाची पाळेमुळे खोल रुतल्याने दिवसागणिक मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच एका मानसिक तणावाखाली वावरत आहे. 

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. कोरोनावर लस येण्यास बराच अवधी असून तोपर्यंत आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि या लढाईत मानसिक आरोग्य हे फारच महत्त्वाचे आहे, असे अपोलो रुग्णालयाचे डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी सांगितले. 

लक्षणांकडे दुर्लक्ष नको 
वैद्यकीय निकषानुसार, एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक हे मनोरुग्ण असतात; मात्र कोरोनामुळे हे प्रमाण वाढत आहे. आत्मविश्वास कमी असणाऱ्या, लहानपणापासून हिंसा, उपेक्षा, शोषण, गरिबीला तोंड दिलेल्या व्यक्ती नैराश्‍यात असतात. उदासीनता, सततची निष्क्रियता, कामातील रुची कमी होणे, स्वभाव चिडचिड किंवा संशयी होणे, शांत झोपेचा अभाव, भूक कमी होणे, सतत नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली राहणे, मूड बदलत राहणे ही मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आत्महत्या करणे, दुसऱ्याला दुखापत करणे तसेच कायमस्वरूपी निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती असते. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 

भारत हा आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमाकांवर असून भारतात दर वर्षी सुमारे अडीच लाख व्यक्तींच्या आत्महत्या होतात. विशेष म्हणजे 15 ते 30 या वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि त्यापैकी 80 टक्के आत्महत्या या मानसिक विकारामुळे होतात. विशेष म्हणजे त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त आत्महत्या थांबवू शकतो आणि त्यासाठीच योग्य वेळी उपचार घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 
- डॉ. प्रतीक सुरंदशे,
मानसोपचारतज्ज्ञ 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com