रेशन कार्ड 'आधार'ला जोडा, अन्यथा...

रेशन कार्ड 'आधार'ला जोडा, अन्यथा...

ठाणे : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशनिंग व्यवस्थेतील कारभार अधिक पारदर्शक होणार आहे, असा दावा केला जात असतानाच आता रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा, शिधापत्रिकेतून नावे वगळल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकाची असेल, असे फलक ठाण्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर लावल्याने नागरिक धास्तावले आहेत. 

रेशनिंग व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत सरकारकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्यासाठी 2015 साली सरकारने रेशनिंग व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, विहित वेळेत आणि पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा आधार घेण्यात आला.

त्यानुसार, ई-केवायसी करण्यासह बायोमेट्रिक आणि पोर्टेबिलिटी पद्धतीचा अवलंब सुरू झाला. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होऊ लागले. शिधावाटप अधिकाऱ्यांद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे शिधापत्रिका धारकांनी आपले आधार कार्ड, आपली जुनी शिधावाटपपत्रिका, बॅंकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्जदेखील भरून दिले होते. 

आता आधार पडताळणीसाठी शिधापत्रिकेवरील सर्वच सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डसोबत पडताळणी केली जात आहेत. याबाबत वारंवार जनजागृती करूनही सदस्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ठाण्यातील रेशन दुकानदारांनी आता चक्क आपल्या दुकानाबाहेरच फलक दर्शवून प्रत्येकाने आधार कार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे आहे. अन्यथा, शिधापत्रिकेतून नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित रेशन कार्ड धारकाची असेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. 

कुठूनही धान्य खरेदी 
एकपेक्षा अधिक रेशन कार्ड वापरणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी देशभरात 1 जूनपासून "वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू होत आहे. एकच रेशन कार्ड देशभरात कुठेही वापरता येणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार, स्थलांतरित कामगार यांना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचा दावा केला जात असून यामुळे कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक अन्य राज्यांतील रेशन दुकानांवरून स्वस्तात धान्य खरेदी करू शकणार आहेत.  

ठाणे शिधावाटप 36 फ विभागात एकूण 7 लाख 44 हजार 181 शिधापत्रिका धारक आहेत. यात प्राधान्य कुटुंब प्रकारातील 7 लाख 31 हजार 507 शिधापत्रिका असून 13 हजार 124 अंत्योदय कार्ड धारक आहेत. अन्न व पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार डिसेंबर 2019 या कालावधीपर्यंत एकूण 92.79 टक्के शिधापत्रिका धारकांनी आधार कार्डचे व्हेरिफिकेशन केले आहे. मात्र, शिधापत्रिकेतील केवळ 69 टक्के सदस्यांनीच आधार कार्डचे व्हेरिफिकेशन पूर्ण केले आहे. यासाठीच जनजागृती मोहीम रेशन दुकानदारांकडून केली जात आहे. 
- विजया रघटवान 
शिधावाटप अधिकारी, ठाणे 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com