मुंबई- कोरोनानं महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात मुंबई शहरामध्ये सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळतोय. त्यातच सध्या देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. त्यातच आताच समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा 31 मेपर्यंत असणार आहे.
त्यामुळे उद्यापासून राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं आदेश काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
याआधी सलग तीन वेळा लॉकडाऊनला मुदतवाढ करण्यात आली होती. चौथ्या टप्प्यात काय बदल केले जाणार आहे, याबद्दल लवकरच केंद्र सरकार घोषणा करणार आहे. त्यामुळे केंद्राच्या नियमावलीकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा जाहीर झाला होता. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 3 मे रोजी सुरु झाला आणि 17 मेपर्यंत होता. आता 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यानं आदेश काढून 31 मेपर्यंत चौथा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
11 राज्यांनी 18 मेपासून या नव्या लॉकडाऊनसंदर्भात विशेष योजना आखल्या आहेत. तसंच महाराष्ट्र राज्यानं गुरुवारी मुंबई महानगर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि मालेगावमध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पूर्वीच हे सर्व हॉटस्पॉट्स म्हणून घोषित करण्यात आलेत.
या सुविधा मिळण्याची शक्यता
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात उद्योग सुरु करण्याबाबत आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे. तसंच सार्वजनिक वाहतूक आणि कॅबलाही परवानगी मिळू शकते. नितीन गडकरी यांनीही याबाबतचे संकेत दिलेत. शाळा कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय. मॉल्स, हॉटेल्स आणि बाजारही बंदच राहतील. अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सूट देण्यात येईल.
लॉकडाऊन 4 चा नवा फॉर्म्युला
आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता
लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. रेड झोन असलेल्या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यावश्यक दुकानं वगळता सर्वच व्यवहार ठप्प असायचे. परंतू आता रेड रेड म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न करता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणारेय. असा निर्णय झाल्यास देशातल्या सर्वच राज्यातली आर्थिक स्थिती सुधारण्यास काही अंशी मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग रेड झोनमध्ये असेल, अशी शक्यता आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वेही धावणार
तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थ्यांसाठी सरकारनं विशेष व्यवस्था करुन ट्रेन, बसेसची सुविधा उपलब्ध करुन दिली. मजुरांना आपल्या स्वगावी सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात रेल्वे वाहतूक पूर्णत ठप्प होती. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेही धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकार यावर विचार करत असून जरी रेल्वे सुरु केली तर त्याचे थांबे मात्र कमी करण्यात येतील, अशी शक्यता आहे.
lockdown extended till 31st may in maharashtra read full story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.