लॉकडाऊनमध्ये जगणेच झाले असह्य! तृतीय पंथीयांनी मांडल्या व्यथा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : समाजामध्ये आधीच तृतीय पंथीय दुर्लक्षित होतेच, परंतु कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा घटक आणखीच दुर्लक्षित झाला आहे. अनेक तृतीयपंथी गलिच्छ वस्तीत एकटेच घरात राहत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. सरकार आमच्या परिस्थितीकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न तृतीय पंथीय उपस्थित करत आहेत. 

घरात बसून जीव घुसमटो...गेले महिनाभर कमाई नाही...औषधपाणी मिळत नाही...ना कोणी रेशन देत, अन्नासाठी वणवण करावी लागते...अजून किती दिवस असे राहायचे...नाही कोणी आमची विचारपूस करत...जसे काही आम्ही या समाजाचे घटकच नाहीत...अशा अवहेलनेला राज्यातील प्रत्येक तृतीय पंथीयाला सामोरे जावे लागत आहे.

राज्यातील तृतीय पंथीय समाजाची परिस्थिती लॉकडाऊनमध्ये बिकट झाली आहे. तृतीय पंथीय नागरिकांकडून पैसे मागून त्यावर गुजराण करतात. तर दुसरा व्यवसाय म्हणजे देह विक्रीचा. हीच त्यांच्या उपजिविकेची साधने आहेत. परंतु उपजिविकेची हीच साधने आता बंद झाल्याने जगायच कसे? असा प्रश्न पडला आहे. अनेक तृतीय पंथी एड्स या आजाराने ग्रासले आहेत. त्यांना नियमित औषधांची आवश्यकता आहे. परंतु या परिस्थितीत त्याच्यापर्यंत औषधही पोहोचत नाही किंवा ते खरेदीसाठी पैसे नाही.

मुंबईसारख्या शहरात सुमारे लाखोंच्या संख्येने तृतीय पंथीयांचे वास्तव्य आहे. सायन, धारावी, मस्जिद बंदर, भायखळा, माहीम, गोवंडी, मानखुर्द, वाशी, अंधेरी, गोरेगाव, दहिसर, वसई, नालासोपारा याठिकाणी तृतीय पंथीयांच्या अनेक वस्त्या आहेत. पण त्यांच्यापर्यंत सरकारी मदत अजून पोहोचलीच नाही. सरकारने कोरोनाच्या लढ्यात जे बटेज जाहीर केले त्यामध्ये तृतीय पंथीयांचा उल्लेखही नाही. मग आम्ही या समाजाचा घटकच नाही का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या प्रिया पाटील यांनी उपस्थित केला. 

मुंबईतील एक तृतीय पंथीय दाटीवाटीच्या वस्तीत राहते, जेथे सोशल डिस्टंसिंग पाळणे अजिबात शक्य नाही. कोरोनाबाबत खूप भीती वाटत असल्याचे तिने सांगितले. घरात अन्न-धान्याची टंचाई आहे. एचआयव्ही बाधित असल्यामुळे औषधाची गरज आहे. राहणाऱ्या परिसरात औषधे मिळत नाही. तसेच वस्तीतून बाहेर पडू शकत नाही.

या परिस्थिती कोणीही मदत करत नसल्याची व्यथा तिने मांडली. आणखी तृतीय पंथीयाने सांगितले की, सरकार शिधा पत्रिकेवर धान्य देणार आहे. पण माझ्याकडे व माझ्या समाजातील अनेकांकडे शिधापत्र नाही. तसेच अन्य कोणतेही सरकारी कागद नाही. त्यामुळे रेशनचे धान्य मला मिळू शकत नाही. मग आम्ही काय खायचे. सरकारने आम्हाला मदत करावी. निदान अन्नधान्य तरी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तिने केली आहे. 

क्लिक करा : खबरदारी म्हणून बेस्टने घेतला वाहकांबाबत मोठा निर्णय    

तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रिया पाटील सांगतात की, माझ्या स्वतःकडे शिधापत्रच नाही पण पासपोर्ट आहे. अनेक तृतीय पंथीयांकडे कोणतीच सरकारी कागदपत्रे नाहीत. त्यांनी या काळात कसे जगायचे? सरकार इतक्या मोठ्या वर्गाकडे दुर्लक्ष कसे करू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

मोठ्या प्रमाणावर तृतीय पंथीय हे गलिच्छ वस्तीत राहतात, तेथे सोशल डिस्टंसिंगचा मोठा प्रश्न आहे, त्यात तृतीय पंथ अनेक रोगांनी त्रस्त असतात. त्यामुळे अशा वस्तांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने या तृतीय पंथींपर्यंत औषध व अन्नधान्याची सुविधा पुरवण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. 


अनेक तृतीय पंथीयांकडे उपजीविकेचे कोणतेच साधन या काळात उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मानसिक तणावातून ते जात आहेत. अनेक सामाजिक संस्था त्यांना मदत करीत असल्या तरी ही मदत तोकडी पडते. त्यामुळे सरकारी मदतीची गरज आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनजंय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिली, परंतु अजून कोणीच प्रतिसाद दिला नाही.
  - प्रिया पाटील,
सामाजिक कार्यकर्त्या

राज्यभरातील तृतीय पंथीयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. जेवण, औषधोपचार आदी सर्वांचेच हाल झाले आहेत.  समाजापासून ते आधीच वंचित होते. पण कोरोनामुळे ते आणखीनच दूर लोटले गेले आहेत. समाज आणि तृतीय पंथीय यांच्यातील दरी या काळात आणखीच वाढत आहे. यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ ढासळत आहे. यातून बाहेर येण्यासाठी त्यांना संवादाची गरज आहे. 
- दिशा शेख, 
सामाजिक कार्यकर्त्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com