Lockdown:: टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवरील बंदी उठवा, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

Lockdown:: टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवरील बंदी उठवा, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र


मुंबई- कोरोनानं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातच सर्वाधिक प्रभाव मुंबईत पाहायला मिळतोय. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प आहे. मात्र काही प्रमाणात सुविधा शिथिल करण्यात आल्यात. पण लोकल सेवासह टॅक्सी, बस सेवा ठप्प आहेत. मुंबईत अत्यावश्यक सेवाचं सुरु आहेत. त्यामुळे जर काही नियम शिथिल केले गेले तर रिक्षा आणि टॅक्सीवर बंदी घालून कशी सुरुवात करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

मुंबईत कोविड-19चे प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होतेय. त्यामुळे प्रशासनाने नवीन नियम आणि कायदे लागू केले, ज्यामुळे शहरातील रहिवाशांचे हाल होताहेत, असं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटलं आहे. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या वाहतुकीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे पत्र लिहिलं आहे. 

राज्यातील कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी जारी केलेल्या आदेशात राज्य सरकारने ऑटो आणि टॅक्सीवर बंदी घातली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. ऑटो आणि टॅक्सी वाहतुकीवर कडक बंदी घातली गेली आहे, तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? असा सवाल अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. 

गलगली म्हणाले की, लोकल ट्रेन, मेट्रो यासारख्या वाहतुकीचाही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बेस्ट बसेस फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच सेवा पुरवतात. मात्र सामान्य मुंबईकरांना प्रवास करण्यास या दरम्यान मुभा देण्यात आलेली नाही. त्यातच सरकारने ऑटो आणि टॅक्सीवर बंदी घातली आहे, मुंबईतल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्यासाठी हा एकच पर्याय होता, कारण प्रत्येक नागरिकांकडे खासगी गाडी नसते, त्यामुळे सामान्य नागरिकांनी प्रवास कसा करायचा? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

गलगली यांनी नागरिकांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था नसल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारला. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत लोकांना रुग्णालयात जायचं असेल तर टॅक्सी आणि ऑटो रिक्षांवर बंदी घातल्यास ते कसे जाणार? असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अ‍ॅड अनिल परब, मुख्य सचिव अजय मेहता आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना पाठविलेल्या पत्रात गलगली यांनी ऑटो आणि टॅक्सींच्या वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com