मुंबई - राज ठाकरे यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार, अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे करणाऱ्या विनोद तावडे यांनी पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला आधी द्यावा, असा टोला मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लगावला.
किल्लेदार म्हणाले, की राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या सभांचा धसका भाजप नेत्यांनी घेतला असून, त्यांच्या भाषणाच्या प्रभावाने भाजपच्या मतांवर परिणाम होईल, या भीतीपोटी बिथरलेल्या तावडे यांनी तथ्य नसतानाही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे .
आतापर्यंत झालेल्या राज यांच्या सभेमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाचे चिन्ह, झेंडे न लावता अमुक उमेदवाराला मत द्या, असे भाषण दिले नाही. राज कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत.
पंतप्रधानांप्रमाणेच जाहीर सभा घेऊन मत मांडण्याचा अधिकार राज यांना नाही का? त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करायचे टाळून ठाकरे यांच्या सभेच्या खर्चाचा बोलबाला करणे म्हणजे राज यांच्यामुळे भाजपला धडकी भरल्याचे दिसते, असे किल्लेदार म्हणाले.
|