मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी रेड झोनमध्ये या आधीच्या तुलनेत कोणतीही शिथिलता देता येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. दरम्यान ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी कशा प्रकारे जनजीवन सुरळीत सुरु होऊ शकेल यावर देखी सरकार विचाराधीन असल्याचं त्यांनी बोलून दाखवलाय. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत, अशात रेड झोनमध्ये शिथिलता देणं परवडणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. अमेरिका, इटली सारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. परिणामी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील मुद्दे :
नवीन उद्योगांबाबत मोठी घोषणा :
येत्या काळात महाराष्ट्रात उद्योग सुरु करणाऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात. महाराष्ट्रात ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नवीन उद्योगांसाठी राखीव ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. परदेशातून किंवा भारतातील उद्योगांना ग्रीन प्रोजेक्टसाठी कोणतीही अट नसणार आहे. ज्यांना महाराष्ट्रात जमीन विकत घेणं परवडत नाही अशा उद्योजकांना भाडे तत्त्वावर जमीन देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
भूमिपुत्रांना आवाहन :
महाराष्ट्रात अनेक उद्योग सुरु होत आहेत. अशात महाराष्ट्रातून परप्रांतीय मजूर निघून जात असल्याने भूमिपुत्रांनी महाराष्ट्रातील उद्योगांना तारण्याची गरज आहे. त्यामुळे जिथे जिथे ग्रीन झोन आहेत तिथे आत्मनिश्चयाने उद्योगांना तारण्यासाठी पुढे या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
रेड झोनमध्ये शिथिलता नाहीच :
सध्या महाराष्ट्रात ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवण्याचं आव्हान आणि रेड झोन ग्रीन झोनमध्ये आणण्याचं आव्हान आहे. अशात रेड झोनमधील उद्योग सुरु झालेत आणि मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला त्यावेळेस काय परिस्थिती ओढवेल? त्यावेळेस एक अघोषित लॉक डाऊन सुरु होईल. त्यामुळे घाई गडबड करू नका. याचसोबत उद्धव ठाकरे यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत लढण्यासाठी एक नवीन नारा दिलाय. उद्धव ठाकरे म्हणालेत, "घरात राहा, सुरक्षित राहा... पण घराबाहेर जाताना सावध राहा"
परप्रांतीय आणि महाराष्ट्रात एका ठिकाणाहून दुरीकडे जाणार्यांना आवाहन :
महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने परप्रांतीय परराज्यात गेलेत. अशात अजूनही काही परप्रांतीयत रस्त्याने चालताना दिसतायत. त्या सर्वांना उद्धव ठाकरे यांनी चालत न जाण्याचं आवाहन केलंय. याचसोबत महाराष्ट्रातीलाही काही नागरिक चालत मुंबई पुण्यातून निघालेत अशाना देखी उद्धव ठाकरे यांनी धीर धरण्याचा सल्ला दिलाय. आपल्या कुटुंबियांसाठी गावाला जाणं थोडं थांबवा, गावाला जाण्याची गरज नसेल तर गावी जाण्याची घाई करू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
पावसाळ्याआधी कोरोनाला संपवायचं आहे
करोनाचे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवावं लागणार आहे, असे सांगत शिस्त आणखी कडक हवी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.
maharashtra cm uddhav thackerays speech on the first day of lockdown four
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.