Coronavirus: लस टोचायला जाताना वैद्यकीय सर्टिफिकेट हवं का? जाणून घ्या

Vaccination-1
Vaccination-1

मुंबई: लसीकरण मोहिमेता गती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक विशेष निर्णय घेतला. आतापर्यंत ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. मात्र आता 1 एप्रिलपासून सरसकट 45 वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जाणार असून केंद्र सरकारने या टप्प्यासाठी मान्यता दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या 45 वर्षांवरील व्यक्तींचा आकडा 45 लाखांच्यावर आहे. या सर्वांना लस टोचण्यासाठी लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे, ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी जाताना कोणत्याही वैद्यकीय सर्टिफिकेटची गरज नसेल असंही पालिकेने स्पष्ट केलं.

सुरूवातीच्या टप्प्यात केवळ कोरोना योद्ध्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जात होती. त्यानंतर ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील को-मॉर्बिलीटी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केलं गेलं. त्यामुळे को-मॉर्बिलिटी असल्याचे वैद्यकीय सर्टिफिकेट सोबत घेऊन जाण्याची गरज होती. परंतु आता लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी यासाठी आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरसकट लस टोचली जाणार आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तींना लसीकरणाला जाताना वैद्यकीय सर्टिफिकेट सोबत ठेवणं बंधनकारक नाही. तसेच, सध्याच्या घडीला रोज सरासरी 40 ते 45 हजार कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या लाखांपर्यंत वाढवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सध्या मुंबईत 100 ठिकाणी लसीकरण होत असून संख्या वाढल्यास लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असेही काकाणी यांनी सांगितले.

नव्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण दोन शिफ्टमध्ये केलं जाणार आहे. सेकंड शिफ्ट आणि काही खासगी रुग्णालयांचा लसीकरणात समावेश करुन घेतला जाणार आहे. जेणेकरुन जवळच्या केंद्रांवर जाऊन ते लस टोचून घेऊ शकतील. लसीचा साठा जेवढा लागत आहे तेवढ्याप्रमाणात तो उपलब्ध आहे. शिवाय, दर आठवड्याला नवीन साठा पालिकेला उपलब्ध होतो. सध्या अडीच लाख वायल्स पालिकेकडे उपलब्ध आहेत. शिवाय, 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या लसींचा साठा हा वेळोवेळी केंद्राकडे मागितला जाईल. त्यामुळे, लसीकरणासाठी लसींचा तुटवडा होईल असे सध्याचे चित्र नसून नागरिकांनी जास्तीत जास्ती लस टोचून घ्यावी असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.

दरम्यान, पालिकेने नागरिकांना पुर्व नोंदणी न करता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याच बरोबर नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘निवासी संकुला पर्यंत लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याचा महानगर पालिकेचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे, असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com