पावणे येथे लागलेल्या आगीची एमआयडीसी प्रशासनातर्फे चौकशी सुरू

एमआयडीसीतील अधिकारी व कंपनीवर प्रश्नचिन्ह

नवी मुंबई - पावणे येथे शुक्रवारी (ता. ६) लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या. या कंपन्यांना लागलेली आग विझवताना या कंपन्यांमध्ये आगरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे. तरीही या कंपन्या सुरू असल्याने एमआयडीसीचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एमआयडीसी प्रशासनातर्फे चौकशी सुरू करण्यात आली असून परवानग्या आणि व्यवस्थापनाचा कारभार तपासला जाणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी पावणे येथील पॉलीमर कंपनीला लागलेल्या आगीत एक व्यवस्थापक आणि एक अभियंता अशा दोन जणांचा जळून मृत्यू झाला. या घटनेला दोन दिवस उजाडल्यानंतरही अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या कंपन्यांमध्ये असणाऱ्या केमिकल आणि साहित्यांबद्दल माहितीचा अभाव असल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याचे एका जवानाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसीचे सर्व अधिकारी कामाला लागले असून त्यांच्याशी संपर्क केला असता कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार

या आगीमुळे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. य कंपनीचे फायर ऑडिट, फिटनेस सर्टीफिकेट, फॅक्टरी इन्स्पेक्शन आदी मुद्दे उपस्थितीत झाल्याने कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंडातर आले आहे. या आगीची चौकशी सुरू असून नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे; परंतु या सर्व बाबी उघड होतील, अशी एक चौकशी लावण्यात येणार असल्याचे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगीच्या मूळ कारणासोबतच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com