Mohan Bhagwat : जगाच्या आशा पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हावे - मोहन भागवत

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अशोक चौगुले यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार करताना भागवत बोलत होते.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatesakal
Summary

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अशोक चौगुले यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार करताना भागवत बोलत होते.

मुंबई - आज भारत मोठा व्हावा ही जगाची गरज आहे. मात्र देशातील आसुरी शक्ती नष्ट होण्याच्या भीतीने भारतवासीयांच्यात आपसात वाद लावत आहेत, जगात भारताबद्दल विकृत गोष्टी सांगत आहेत. त्या आव्हानांना तोंड देऊन आपण जगाच्या आशा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज येथे काढले.

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अशोक चौगुले यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार करताना भागवत बोलत होते. यावेळी सुधाताई चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय जलवाहतूक मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, अयोध्येच्या राममंदिर तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, गोव्याचे ब्रह्मेषानंदजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्कारामुळे आपले काम असेच पुढे सुरु ठेवण्यास उर्जा मिळेल, असे चौगुले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

अमृत महोत्सव म्हणजे वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्या व्यक्तीने समाजाला अमृत द्यावे यासाठी हा उत्सव असतो. मात्र चौगुले यांनी आतापर्यंत हेच केले आहे. आपण महापुरुषांना आदर्श मानतो, पण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्यास कचरतो. अलौकिक लोक अशा मार्गावर समाजाच्या दोन पावले पुढे असतात. ते पाहून लोकही दोन पावले त्या मार्गावर पुढे जातात. हेच काम चौगुले करीत आहेत, असे प्रशंसोद्गारही भागवत यांनी काढले.

आज भारतीयांचे अनुकरण करण्याच्या स्थितीत जग आले आहे. व्यवहार, नीती, राष्ट्रांचे परस्पर संबंध कसे असावेत याची उदाहरणे आपल्याकडून जगाला हवी आहेत. कारण आतापर्यंतच्या या ठरलेल्या गोष्टी अपयशी ठरल्या आहेत.

सृष्टीचे संवर्धन कसे करावे हे देखील आपण जगाला दाखवत आहोत. तर्क, युक्तिवादाने आपला पराभव करणे अशक्य असल्याने दुष्टशक्तींमार्फत कुतर्क किंवा कपट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीस-तीस वर्षांनी भारत विश्व गुरु बनायला हवा असेल तर दोन-तीन पिढ्यांना आपण शिक्षित केले पाहिजे. कपटी लोकांशी संघर्ष, जनजागृती, विश्व संपर्क आणि ज्ञान वाढवा या गोष्टीही आपण करणे आवश्यक आहे. आज राष्ट्र म्हणून आपल्यासमोर नवी परिस्थिती आली असून त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गावोगावी या गोष्टी करणारे मान्यवर आपल्याला लागतील. चौगुले हे अशाच मान्यवरांपैकी असून त्यांचे अनुकरण समाजाने करावे, हीच त्यांना शुभेच्छा ठरेल असेही भागवत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com