सर्वसामान्यांसाठी मुंबईतील लोकल सुरू झाल्यानंतर कसं बदललं मुंबईकरांचं आयुष्य ?

सर्वसामान्यांसाठी मुंबईतील लोकल सुरू झाल्यानंतर कसं बदललं मुंबईकरांचं आयुष्य ?

मुंबई: गर्दीची वेळ टाळून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरु झाला आहे. लोकल प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, लोकल प्रवाशांकडून नियमांचे पालन होत नाही. परिणामी, लोकलमध्ये रेलचेल वाढली आहे. धक्काबुक्कीतून भांडणे होणे सुरु झाली आहेत. तर, विना मास्क फिरताना स्थानक परिसरात दिसून आल्यास महापालिका कर्मचाऱ्यांकडून दंड वसुली केली जात आहे. मात्र, दंड भरण्यास प्रवाशांकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.  

दहा महिन्यानंतर लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे. सर्व प्रवाशांसाठी लाेकल सुरू करताना गर्दी होणार नाही व फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, प्रवासी या आवाहनाला साद देत नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. अनेक रेल्वे स्थानकावर प्रवासी तोंडाला मास्क लावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे, या प्रवाशांना दंड ठोठावण्यासाठी महापालिकेचे क्लिनप मार्शल येतात. मात्र, प्रवाशांकडून  क्लिनप मार्शलशी वाद घातला जात आहे. त्यामुळे अखेर स्थानकावरील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी येऊन कारवाई करत आहेत. 

विना मास्क  प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. महत्वाच्या रेल्वे स्थानकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने ५०० पथके तयार करून ती कार्यरत केली आहेत. रेल्वे स्थानके व गाडीतही प्रवाश्यांना नियम पाळण्याचे आवाहनही स्पीकर वरून करण्यात येते. तरीही  काही प्रवासी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.  यामध्ये सर्वाधिक कारवाई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पालिका कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे होत असल्याचे चित्र आहे. 

रेल्वे परिसर, लोकलमधून प्रवास करताना मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा. वारंवार हात स्वच्छ करत रहा. रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आलेल्या महानगर पालिका कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांना सहकार्य करण्याचे असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासानाकडून करण्यात आले आहे.  

उपनगरीय लोकल मधील गर्दी ५० टक्क्यांनी वाढली 

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेसाठी सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठराविक वेळेत लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला आहे. त्यानुसार सर्वसामान्य प्रवासी तिकीट, पास काढून प्रवास करत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास सुरु झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱ्या वाढवून सर्व सामान्य प्रवाशांसाठी खुल्या केल्या. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरुन सुमारे २० ते २२ लाख प्रवासी तर, पश्चिम रेल्वे मार्गावरून सुमारे दररोज १८ ते २० लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

mumbai coming back on track after local trains starts for common man of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com