"मुंबईत फिरायचं असेल तर..."; पोलीस आयुक्तांनी केलं ट्वीट

Param-Bir-Singh
Param-Bir-Singh

मुंबई: मुंबई दर्शनासाठी येणारे पर्यटक आपण नेहमी पाहतो. मुंबई पाहायला आलेले पर्यटक मरिन ड्राईव्ह, चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जातात. मुंबई दर्शनच्या सफरीमध्ये महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांचा समावेश असतो. त्यासोबतच मुंबईत येणाऱ्या लोकांना वडापावचंदेखील प्रचंड आकर्षण असतं. सध्या कोरोनाची दहशत असल्याने मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. पण तरीदेखील मुंबई दर्शनसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ट्विटरवरून एक मजेशीर पण तितकंच सूचक ट्वीट करण्यात आले. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला. लोकांनी जर कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करावा लागेल आणि याबद्दल दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. याच पार्श्वभूमीवर मंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ट्वीट केलं. मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना त्यांनी एक सूचक इशारा दिला.

मुंबई दर्शनसाठी अनेक लोक येतात. महाराष्ट्राच्या इतर भागांतून आलेल्या लोकांना मुंबईत आल्यावर गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह या साऱ्या ठिकाणांचं अप्रूप असतं. तसेच मुंबईच्या टपरीवर मिळणारा स्वादिष्ट वडापाव हे देखील पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. याच मुद्द्यांचा फोटो मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. पण त्याचसोबत त्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एक चौथी गोष्ट समाविष्ट केली आहे. मुंबईत फिरायला आलेल्यांनी प्रेक्षणीय स्थळे जरूर पाहावीत. येथील चविष्ट पदार्थांचा आस्वाददेखील घ्यावा. पण त्याचसोबत मुंबई फिरताना मास्क लावणं अत्यावश्यक आहे. ते कोणीही विसरू नये, असा संदेश त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला.

दरम्यान, करोनाचा धोका लक्षात घेता काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाउन करायला लागेल का? असा सवाल गुरूवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावेळी बोलताना, "तुम्ही आणि आम्ही, सारेच सध्या मास्क घालतोय. जर प्रत्येक नागरिकांनी आपापली काळजी घेतली आणि मास्कचा वापर केला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि कोरोना प्रसाराला आळा बसेल", असं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी त्यांना मुंबईतील पूर्णत: किंवा अंशत: लॉकडाउनबाबतही प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोरोना लस घेतली. त्यावरही आदित्य यांनी मत व्यक्त केलं. "लसीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना स्वत: मुख्यमंत्र्यांनी लस टोचून घेतली आहे. त्यांनी जनतेसमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं. जे लस घेतील त्यांना नक्कीच कोरोनापासून सुरक्षा मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाची लस घेतली पाहिजे", असं आवाहन त्यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com