Farmers March : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत 'मार्च', जाणून घ्या महत्त्वाच्या मागण्या

Farmers March : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत 'मार्च', जाणून घ्या महत्त्वाच्या मागण्या

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मार्च काल मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईत धडकलाय. दिल्लीच्या वेशीवर अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन सुरु आहे. विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि सरकारमधील बैठका एका बाजूला निष्फळ ठरत असताना आज मुंबईत धडकलेला शेतकरी मोर्चा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काढला गेला आहे. आज शेतकरी संघटनांकडून  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे.    

  • नाशिकच्या गोल्फ क्‍लब मैदानातून निघाला शेतकरी मार्च 
  • काल ( २४ जानेवारी २०२१ ) रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या कसारा, भिवंडी मार्गे मुंबईतील आझाद मैदानात धडकला शेतकरी मार्च 
  • हजारो शेतकरी ट्रक, टेम्पो, चारचाकी, दुचाकीने मोर्चात सहभागी.
  • शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावे ही प्रमुख मागणी 
  • शेतमालाला पुरेसा मोबदला देणारा हमीभाव देण्याची तरतूद असलेला कायदा करावा
  • आझाद मैदानात हा मोर्चा तीन दिवस मुक्कामी असणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्यातील प्रमुख नेते मोर्चात सहभागी होणार आहेत असं संयोजकांनी सांगितलंय.

अशात शेतीच्या हमीभावासाठी आणि तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने मुंबईत दाखल झालो आहोत. जर केंद्र सरकारने आमची भूमिका मान्य केली नाही तर आम्ही आणखी व्यापक आंदोलन करू, असं मोर्चातील काही शेतकरी म्हणतायत. 

किसान मोर्च्याला संबोधित करण्याचे सेनेला निमंत्रण 

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे मोर्च्याला संबोधित करावे अशी आमची इच्छा सेनानेतृत्वाकडे व्यक्त केल्याची माहिती कम्युनिस्टनेते डॉ.ढवळे यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या मोर्चाला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यातील सुमारे 15 हजार शेतकरी या मोर्च्यासाठी मुंबईत पोहोचले  आहेत. 

mumbai farmers march to support farmers agitating on the delhi singu border

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com