
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेवर एकूण 7 हजार 715 कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
मुंबई : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख 10 हजार 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात मध्य रेल्वेवर एकूण 7 हजार 715 कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. यामुळे कल्याण-कसारा तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेवर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कल्याण-कसारा 67.62 किमीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी 168.24 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे डब्यांची सुविधा वाढविण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पनवेल-कळंबोली डब्यांचा टर्मिनस पहिला टप्प्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधेसाठी 60 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
सीएसएमटीला सुधारणांची झळाळी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 10, 11, 12, आणि 13 या फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या फलाटांवर 24 डब्यांची एक्स्प्रेस गाडी थांबणार आहे. यासाठी 20 कोटींची तरतूद केली आहे. मध्य रेल्वेवरील जुन्या एटीव्हीएम मशीन बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील 605 एटीव्हीएम मशीन बदलण्यात येणार आहेत. यासाठी 9 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा
पुलाच्या कामांना चालना
- विक्रोळी येथील रोड उड्डाणपुलासाठी 10 कोटी आणि दिवा येथील उड्डाणपुलासाठी 10 कोटी रुपये.
- कल्याण येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी 7.17 कोटी रुपये.
- दिवा-वसई दरम्यानच्या तीन रोड ओव्हर ब्रिजसाठी प्रत्येकी 3 कोटी, तर दिवा-पनवेल रोड उड्डाणपुलासाठी 3 कोटी
- सरकत्या जिन्यासाठी 50.16 कोटी
- पादचारी पुलांच्या कामासाठी 80 कोटी
-------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Mumbai Local train latest marathi news Relief to Kalyan Kasara passengers latest update