डोंबिवली - राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपची बेरजेची गणिते विविध पातळ्यांवर सुरू आहेत. त्यातच कल्याण व भिवंडी लोकसभेतील खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण भागातील एका पदाधिकाऱ्याच्या कार्यपद्धती वरून हा वाद विकोपाला गेला असल्याचे पहायला मिळत आहे.
त्यातच आता कोणाच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही असे म्हणत आमदार कथोरे यांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष रित्या टोला लगावला आहे. यामुळे हा वाद आता कोणते राजकीय वळण घरतो याची चर्चा रंगू लागली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात भाजपने आपली मोठी ताकद निर्माण केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील यांची केंद्रात वर्णी लागून त्यांच्याकडे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदाचा कारभार पक्षाने सोपविला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपले कंबर कसली असून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजपने वर्षभरापासून जिथे जिथे आपली ताकद कमी आहे, त्या ठिकाणी मंत्र्यांचे दौरे आयोजित करत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत तसे काम देखील सुरू केले आहे.
ग्रामीण भागात मोठी ताकद उभी करणाऱ्या भाजपमध्ये सध्या केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील जाहीर वादामुळे दुहीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपचे ग्रामीण भागाचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांची कार्यपद्धती सध्या या दोन नेत्यांच्या वादाचे कारण ठरली असल्याचे बोलले जात आहे.
पाटील यांचे समर्थन लाभलेल्या मोहपे यांना हटवावे यासाठी कथोरे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु केल्याने एरवी सुरक्षीत वाटणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यातच आता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील कोणाच्याही असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया मध्यमांना दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांना नाव न घेता टोमणा मारल्याची चर्चा कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात रंगू लागली आहे.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील काय म्हणाले....
भारतीय जनता पक्ष हा पक्ष म्हणून काम करतो. कोणत्याही व्यक्तीची ताकद नसून कपिल पाटील यांच्या पाठीमागून भाजप वजा केली तर कपिल पाटील यांची किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे कोणीही असे समजण्याचे कारण नाही की तो आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. तर ते नंदनवनात वावरतात. कोणाच्याही काहीही केल्याने काही कोणाला फरक पडत नाही. मोदींचे नेतृत्व जगाने तर देवेंद्रजींचे नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे.
त्यांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या बळावर भाजप उमेदवाराला मते मिळतील. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामसभेत कुठेही कोणाच्या असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही. 2014 ला ते होते कुठे, तेव्हाही भारतीय जनता पक्षाचाच विजय झालेला आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांचे नाव न घेता टोमणा मारलायची चर्चा आहे...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.