डोंबिवली : रस्त्यावरील खड्डे भोवल्यामुळे ठाणे महापालिकेतील चार अभियंते निलंबित झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शीळ दिवा रस्त्याच्या दुरावस्थेकडे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी 17 कोटी मंजूर झाले असतानाही नगरसेवकांच्याच निष्काळजीपणामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे असे म्हणत एक प्रकारे घरच्यांनाच टोला लगावला आहे.
दिवा प्रभाग समितीतील आगासन, बेतवडे, म्हातार्डी, साबे, दिवा, दातीवली आदी परिसराला जोडणारा शीळ दिवा रस्ता हा प्रमुख रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. नुकतेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांची पहाणी केली. या खड्ड्यांवरून चार अभियंत्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिवा शीळ रस्त्यांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधू केले आहे. या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. याविषयी माजी आमदार भोईर म्हणाले, रस्त्यांची कामे, त्यांची देखभाल दुरुस्ती ही ठाणे महापालिकेचीच जबाबदारी आहे, मात्र नगरसेवकांनीही कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना लोकांनी निवडून दिले आहे त्यामुळे त्यांनी सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मी आमदार असताना रस्ता अत्यंत मजबूत होता. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी डिसेंबर 2019 मध्ये 22 कोटीचे टेंडर काढले होते. त्याचा अध्यादेश देखील निघाला. मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी 17 कोटी मजूर देखील झाले. त्याचा केवळ पाठपुरावा केला असता तर आज रस्ता चांगला असता. मात्र नगरसेवकांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची आज दुरावस्था झाली आहे. रस्त्याचे काम सुरू झाले आहे मात्र थातुरमातुर काम न करता त्याचे काम नीट झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार आहे असे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.