नव्या निर्बंधांमुळे मुंबईत आणखी ३० टक्के हॉटेल्स बंद होणार?

hotel.jpg
hotel.jpg

कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रात्रीचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे रात्री आठ नंतर मुंबईत रस्ते ओस पडू लागले आहेत. दुकाने, हॉटेल्स बंद करण्यात येत आहेत. हॉटेल्समध्ये ग्राहकांसाठी पार्सलची सुविधा सुरु ठेवायला परवानगी देण्यात आलीय. मात्र ग्राहकांना हॉटेल्समध्ये बसून खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेण्याची परवानगी नाहीय. त्यामुळे हॉटेल, बार, रेस्टॉरंट मालक चिंतेमध्ये आहेत. कठोर निर्बंधांमुळे उद्योग कोलमडून पडण्याची भीती त्यांच्या मनात आहे. रविवार रात्रीपासून निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमा हॉल्स आणि सार्वजनिक स्थळे रात्री आठ नंतर बंद करण्यात येत आहेत. रात्री आठनंतर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र जमण्यावर बंदी आहे. हे नवे निर्बंध मागे घ्यावेत, यासाठी इंडस्ट्री असोशिएशनचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

"मिशन बिगिन अगेन अंतर्गत आम्हाला सर्वात शेवटी परवानगी देण्यात आली होती. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात रेस्टॉरन्टसना परवानगी देण्यात आली होती. मर्यादीत ग्राहकसंख्येसह ही परवानगी दिली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाही अशाच प्रकारचे निर्बंध घातले. रात्री ११ पर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरन्टस बंद करण्याचे निर्देश दिले होते. अनेक हॉटेल मालकांनी आपल्या कर्मचारी संख्येत कपात केली, अजूनही व्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेला नाही. सरळ बंद करण्याऐवजी सोशल डिस्टन्सिंग अधिक कठोर करावे" असे दादर मधल्या एका हॉटेल मालकाने सांगितले. 

"आम्ही आधीच निम्म्याने ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स चालवत आहोत. संपूर्ण दिवसभरात रात्री आठ ते ११ या वेळेत जास्त ग्राहक हॉटेलमध्ये येतात. सध्याच्या निर्बंधांमुळे फक्त नुकसानच जास्त होईल" असे अंधेरीतील एका कॅफे मालकाने सांगितले. "नव्या निर्बंधांमुळे ३० टक्के हॉटेल्स बंद होऊ शकतात, कारण हॉटेल चालवणे त्यांना परवडणार नाही" असे हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोशिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाकडून सांगण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. 

"लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अनेक हॉटेल्स सुरु झाले. व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी मालकांनी बरेच पैसे खर्च केले. हॉटेल आणि लंच व्यवसाय कॉर्पोरेट सारखा नाही किंवा घरातून वर्क फ्रॉम होम करता येत नाही. लंच बिझनेस २० टक्के, तर डिनर बिझनेस ९० टक्के आहे.  डिनर बिझनेस रात्री आठ नंतर सुरु होतो आणि हॉटेल्स त्याचवेळी बंद असणार" असे HRAWI चे उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले. 

लॉकडाउन आधीपासून अस्तित्वात असलेली ३० टक्के हॉटेल्स आधीच बंद झाली आहेत. नव्या निर्बंधामुळे आणखी ३० टक्के हॉटेल्सचे भवितव्य तसेच असू शकते, असा इशारा शेट्टी यांनी दिला. ऑनलाइन पार्सलचा व्यवसाय फक्त २० टक्के असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com