नवी मुंबईच्या नव्या आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; कोविड नियंत्रणासाठी कसली कंबर! वाचा सविस्तर

नवी मुंबईच्या नव्या आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; कोविड नियंत्रणासाठी कसली कंबर! वाचा सविस्तर


नवी मुंबई : शहरात वाढत्या कोव्हीड-19 ला रोखण्यासाठी नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दंड थोपटले आहेत. कोरोनाच्या रुग्णांना सुविधा पोहचवण्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये. याकरिता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 24 तास सेवेत राहण्याचे आदेश बांगर यांनी दिले आहेत. तसेच कोव्हीड नियंत्रण येई पर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या एक परिपत्रक काढून रद्द करण्यात आल्या आहेत. 

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांच्या आकड्याने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता हा आकडा लवकरच 12 हजारांपर्यंत झेपवणार आहे. रुग्णांमुळे महापालिकेचे शहरात रुग्णालये आणि खाजगी रुग्णालये भरून गेली आहेत. नागरी आरोग्य केंद्रात रोज हजारो रुग्णांची तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत सरकारने टाळेबंदीत फक्त 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्याच्या सूचना केल्याने महापालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर कामाचा वाढता ताण पाहता इतर विभागातील अधिकाऱ्यांना कोव्हीड-19च्या कर्तव्यावर नियुक्त केले आहेत. या कामात काही प्रमाणात शिक्षकांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाच्या कर्तव्यावर असणाऱ्या काही अधिकाऱ्यांवरील जबाबदारीत परिस्थिती नुसार बदल करण्यात येतात. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाते. परंतु काही नागरी आरोग्य केंद्र, रुग्णालये येथील अधिकारी कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेत नियुक्ती केल्याचे समजताच आजारपाणाचे करणे देऊन सुट्ट्या टाकून पलायन करतात. अशा तक्रारीमध्ये वाढ होत चालली होती. त्यामुळे मनुष्यबाळात आणखीनच तुटवडा निर्माण होऊ लागला.

याबाबत जेव्हा बांगर यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली तेव्हा, अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे संकेत दिले होते. कोरोना ही जागतिक महामारी आहे. त्यामुळे सरकारने कोरोनविरोधात युद्ध पुकारले आहे. अशा युध्दजन्य परिस्थिती सैनिकांच्या सुट्ट्या रद्द होतात. महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा कोरोनयोद्ध्ये आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी 24 तास रुग्णांच्या सेवेत हजार राहतील अशा सूचना बांगर यांनी त्याच वेळेस दिल्या होत्या. त्यानुसार बांगर यांनी 18 जुलैला परिपत्रक काढून 1 व 2 वर्गातील अधिकाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या कोरोना संपेपर्यंत रद्द केल्या आहेत. तसेच विविध विभागाचे प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांनी 3 आणि 4 वर्गातील कर्मचाऱ्यांना कामाची गरज लक्षात घेऊन कामावर हजार होण्याच्या सूचना द्याव्यात असे आदेश बांगर यांनी दिले आहेत. 

कामगार संघटनांचा सावध पवित्रा 

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या आदेशांचे नागरिकांमधून कौतुक होत असले, तरी कामगार संघटनांनी सावध पवित्रा घेतला आहे. कोरोना संक्रमण कमी व्हावे, रुग्णांना चांगल्या सेवा मिळाव्यात म्हणून अधिकारी व कर्मचारी 24 तास सेवेत हजार राहतील. मात्र कोरोनाच्या कर्तव्यावर असताना काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर प्रशासन दुर्लक्ष करते. त्यादरम्यान त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याकडेही बांगर यांनी लक्ष द्यावे. असे इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मागणी केली आहे.

-----------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com