‘भारत जोडो’ मुळे मविआला यश विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा; जनतेने राज्यघटना वाचविली

तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने विदर्भात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला.
vijay wadettiwar
Vijay Wadettiwarvijay wadettiwar

मुंबई : ‘‘काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या करिष्म्यामुळे महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते शरद पवार यांनी ‘बाप बाप होता है’ हे दाखवून दिले,’’ असा हल्ला विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस संकटात असताना विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने विदर्भात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला.

ज्या भागातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची यात्रा गेली त्या ठिकाणी यश मिळाले. त्याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेत्या प्रियांका गांधी, राज्याचे प्रभारी चेन्निथला यांच्या सभा झाल्या त्या ठिकाणी देखील यश मिळाले आहे.

याउलट पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे जनतेने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याचे सिद्ध झाले आहे.’’ पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता ते म्हणाले, की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ‘नकली सेना’ म्हणून हिणवले, त्यांनादेखील जनतेने धडा शिकवला.

महाविकास आघाडीच्या सामूहिक प्रयत्नांचे हे मोठे यश असून, जनतेने जुमलेबाजांना गाडले आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर राज्यघटना बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार करत राज्यघटना वाचविली असल्याचे वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केले आहे.

मुंबई येथे आपल्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आभार मानले. ‘‘देशातील जनतेने राज्यघटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी ‘जुमलेबाज’ जोडीला बहुमत दिले नाही.

सत्तेसाठी एकत्र आलेल्या ‘जुमलेबाजां’नी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडले, विनाकारण नेत्यांना तुरूंगात डांबले. कायद्याचा गैरवापर केला. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला. या सत्ताधाऱ्यांच्या संकटापुढे जे टिकले त्यांचे कौतुक आहे. परंतु जे घाबरून पळून गेले त्यांचे राजकारण संपणार आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

त्यांचा आनंद अवकाळीसारखा

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे. मंत्री उदय सामंत जातीयवादी बोलत आहेत. त्यांचा आनंद हा अवकाळी पावसासारखा आहे, अशा शब्दांत त्यांनी शेलार आणि सामंत यांचा खरपूस समाचार घेतला.

मोदी लाट संपली आहे. याचे भान या नेत्यांना नाही. अशा वाचाळवीरांमुळेच भाजप महाराष्ट्रात एक आकड्यावर आला आहे. त्यामुळे अशा नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com