
"ट्विटरच्या ब्लू टीकपेक्षा लसीकरणाच्या टीक्याकडे लक्ष द्या"
नवाब मलिकांचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला
मुंबई: भारताने सोशल मिडीयाबद्दलचे (Social Media Rules) काही नियम तयार केले आहेत. ट्विटर (Twitter), व्हॉट्सअँप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इतर सर्वच सोशल मिडीया अँपसाठी (Social Media Platforms) हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे भारत सरकारने (Govt of India) सांगितले आहे. त्यामुळे ट्विटर आणि सरकारमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. तशातच, भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी यांच्या नावापुढील व्हेरिफाईडची (Verified) ब्लू टीक (Blue Tick) ट्विटरने काढून टाकली. या गोष्टीबद्दल भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने चूक सुधारली. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारला खोचक सल्ला दिला. (Pm Modi Govt should Focus on Corona Vaccination instead of Twitter Blue Tick Politics slams NCP Nawab Malik)
"ब्लू टीक' आणि लसीकरणाचा टीका यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यायला हवा. 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाच्या टीक्याकडे केंद्र सरकार आणि भाजपने जास्त लक्ष द्यावे. ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार 'ब्लू टीक'ची लढाई लढताना दिसत होती तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाच्या टीक्याची लढाई लढत आहे. ट्विटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल. यावरून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल आहे. त्यांनी ब्ल्यू टीकच्या राजकारणातून बाहेर यावं आणि लसीकरणातील टीक्याकडे लक्ष द्यावं", असा टोला लगावत नवाब मलिक यांनी मोदींना टोला लगावला.

Nawab-Malik.jpg
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे श्रेय जनतेलाच!
"महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केल्याने हे घडले आहे. राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात कमी निर्बंध आहेत तर काही जिल्हयात जास्त निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरच आपण कोरोनातून मुक्त होवू. जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. या दहा जिल्ह्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर ते दुसर्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा", असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.