Narayan Rane: कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले - नारायण राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayn Rane_PM Modi

कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले - नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कामाची प्रशंसा केली आहे. कोरोना काळात तर मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवलं. त्यामुळं मला त्यांच्या मंत्रिमंडळात असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. नारायण राणे यांच्याघरी आज गणेशाचं आगमन झालं. यानिमित्त सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा वेब पोर्टलशी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. (PM Narendra Modi invented many medicines during Corona period says Narayan Rane)

"पंतप्रधान म्हणून मोदी उत्कृष्ट काम करत आहेत. देशात अनेक योजना त्यांनी आणल्या यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय, महिलांसाठीच्या योजना असतील किंवा अनेक विकासाच्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी संकटात सापडलेल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं. औषधांचे शोध लावले, इंजेक्शनचे शोध लावले, वेगवेगळे डोस देण्यात आले. आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवलं. त्यामुळं मला अभिमान आहे या मंत्रिमंडळात असल्याचा. देशाला योग्य पंतप्रधान मिळालेत अतिशय चांगला कारभार ते करत आहेत. ते भारताला आत्मनिर्भर भारत बनवतील असा मला विश्वास वाटतो," अशा शब्दांत नारायण राणे यांनी मोदींचं कौतुक केलं.

महाराष्ट्रात सत्तांतर झालं ही गणेशाची कृपा

महाराष्ट्रात यावर्षी गणेशाच्या आगमनापूर्वीच सत्तांतर झालं, ही गणरायाची कृपा आहे. त्यामुळं राज्यातील अडीच वर्षांपासूनच संकट टळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं सरकार आलं. अडीच वर्षात कायदा सुव्यवस्था नव्हती, विकास नव्हता. कोणत्याही क्षेत्रात उद्धव ठाकरेंच सरकार काम करु शकलं नाही. लोकांना न्याय देऊ शकलं नाही, असंही राणे पुढे म्हणाले.

दिशा सालियानची केस अद्याप संपलेली नाही - राणे

इथं सुशांत सारख्या कलाकाराची हत्या झाली. दिशा सालियान हिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या झाली. मी वारंवार हा मुद्दा मांडतोय कारण या प्रकरणात अन्याय झाला आहे. निरपराध माणसांना मारलं गेलं आणि यामागे सरकारच्या काही लोकांचा हात आहे. एका तत्कालीन मंत्र्याचा सहभाग आहे. हे पचवलं जातंय हा अन्याय आहे. हा अन्याय दूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हत्या आणि बलात्काराची केस संपणार नाही, ती पुन्हा ओपन होईल असा मला विश्वास आहे.