राज ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन, महत्त्वाच्या विषयावर चर्चा

राज ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन, महत्त्वाच्या विषयावर चर्चा

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी, ११ एप्रिलला होणार आहे. गेल्या महिन्यात होणारी MPSCची पूर्वपरीक्षा कोरोनाच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. १४ मार्चची परिक्षा ही पुढे ढकलून २१ मार्चला घेण्यात आली होती. त्यावेळी परिक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारबद्दल रोष दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. तसेच, ११ एप्रिलची परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होइल असंही सांगितले होतं. पण गेल्या काही दिवसात कोरोनाचा वाढता धोका पाहता ही परिक्षा पुढे ढकलावी अशी विनंती करणारा फोन राज ठाकरेंनी केल्याची माहिती आहे.

MPSC च्या परीक्षा ११ एप्रिलला आहेत. या परिक्षांसाठी विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत होते. त्यातील अनेक मुलांनी आणि पालकांनी मनसेचे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांना फोन केला आणि आपल्या अडचणी सांगत राज्य सरकारला परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्याची मागणी केली. या विषयाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधत याबद्दलची भूमिका ठरवण्याची विनंती केली. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने मधल्या काळात अनेक विद्यार्थी हे लक्षणविरहीत कोरोनाने ग्रासले आहेत. त्यांची परिक्षा देण्याची अडचण आहे. तसेच, काही विद्यार्थी परिक्षा असल्याने चाचण्या करण्यासही नकार देत आहेत. अशा भीतीच्या वातावरणात MPSCच्या परिक्षा होऊ नयेत. या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विनंती करण्यासाठी हा फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, निवडणुका असलेल्या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध लादावेत कारण ते लोक सुपर-स्प्रेडर ठरू शकतात, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. "राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे", असं ट्वीट नांदगावकर यांनी केलं. तसेच, सध्याची कोरोनास्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com