Raksha Bandhan : सैनिकांसाठी सिंधुताईंच्या लेकींनी पाठविल्या एक हजार राख्या

अनाथांची माई पद्मश्री दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण या संस्थेत 'एक राखी सीमेवरील भावासाठी - सैनिक हो तुमच्यासाठी' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
Rakhee
RakheeSakal

मुंबई - भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सख्खा भाऊ नसला तरी सीमेवरील या सैनिकांना भाऊ मानणाऱ्या सिंधुताईंच्या लेकींनी सीमेवर एक हजार राख्या पाठविल्या आहेत.

अनाथांची माई पद्मश्री दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण या संस्थेत 'एक राखी सीमेवरील भावासाठी - सैनिक हो तुमच्यासाठी' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

गेल्या वर्षीपासून दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक गायकवाड यांच्या संकल्पनेतून 'एक राखी सीमेवरील भावासाठी - सैनिक हो तुमच्यासाठी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी या उपक्रमाचे द्वितीय वर्ष असून नुकतेच सीमेवरील वेगवेगळ्या भागात असलेल्या सैनिकांच्या बेस कॅम्पवर स्पीड पोस्टाद्वारे एक हजार राख्या पाठविण्यात आल्या आहेत.

मागीलवर्षी या सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून राखी बांधतानाचे फोटो देखील पाठविले आहेत. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रति प्रत्येकाला आदर अन् अभिमान वाटत असतो. हा आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी राखी आणि शुभेच्छापत्रे हा एक उत्तम मार्ग आहे. 'आम्हालाही भविष्यात सैनिक होऊन भारत मातेची सेवा करायची आहे.

आपल्या भारत मातेच्या रक्षणार्थ उभ्या असलेल्या आमच्या बांधवांचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. केवळ एकाचं नाही तर देशातील प्रत्येक बहिणींचे भाऊ अहोरात्र भारतमातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे', अशा भावना ममता बाल सदन मधील मुलींनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ममता बाल सदनच्या अधीक्षिता स्मिता पानसरे, सुजाता गायकवाड, संजय गायकवाड, सरोज जांगडा, मोनिका क्षीरसागर, कल्पना कुंजीर, चांदणी शिरोळकर यांनी परिश्रम घेतले.

सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत

रक्षाबंधन हे आता बहिण-भावापुरते मर्यादित न राहता, रक्षणकर्त्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे. निसर्गाशीही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे. अशावेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोहोचवणे म्हणजे सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल.

देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठविण्याचा हा उपक्रम विविध ठिकाणी मोठया प्रमाणात राबविण्यात यायला हवा. या उपक्रमांमुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढते.

- दिपक गायकवाड, सिंधुताईंचे मानसपुत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com