...अन् डहाणू, तलासरीचे ते 1 हजार मच्छीमार माघारी फिरले

File Photo
File Photo

बोर्डी ः बोटींमध्ये अडकलेल्या आणि वेरावळ येथून उंबरगाव बंदरात आणलेल्या 2700 पैकी 1700 गुजराती मच्छीमार मजुरांना प्रवेश देऊन उर्वरित महाराष्ट्रातील डहाणू व तलासरी तालुक्‍यातील 1000 मच्छीमार कामगारांना जिल्हा बंदीमुळे किनाऱ्यावर उतरविण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे या एक हजार मच्छीमार मजुरांचा पुन्हा वेरावळच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांनी आतापर्यंत देऊपर्यंतचा पल्ला गाठल्याची माहिती अडकलेल्या खलाशांपैकी चंद्रकांत शंकर बोबा यांनी दूरध्वनीवरून "सकाळ'ला दिली.

समुद्रात 27 बोटींमध्ये अडकलेल्या 2700 मच्छीमार मजुरांना शनिवारी वेरावळ येथून उंबरगाव बंदरात आणण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील डहाणू व तलासरी तालुक्‍याच्या 1000 मच्छीमार मजुरांना जिल्हा बंदी असल्याच्या कारणास्तव बलसाड जिल्हाधिकाऱ्यांनी किनाऱ्यावर उतरविण्यास मनाई केली होती. अखेर या सर्व खलाशांनी पुन्हा वेरावळ येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 23 नौका सुमारे एक हजार खलाशी कामगारांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत. सोमवारी (ता. 6) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत म्हणजेच बारा तासांत त्यांनी दीव केंद्रशासित प्रदेशापर्यंतचा पल्ला गाठला असल्याचे बोबा यांनी सांगितले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेरावळ येथे पोहोचू, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आमची महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर सुरक्षितपणे सुटका करावी, अशी विनंती बोबा यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

उंबरगावकऱ्यांकडून दगडफेक 
वेरावळ येथून उंबरगाव बंदरात दाखल झाल्यावर 2700 पैकी 1700 गुजराती मच्छीमार मजुरांना प्रवेश देण्यात आला. त्यावर महाराष्ट्रातील डहाणू व तलासरी तालुक्‍यातील 1000 मच्छीमार कामगारांनी आम्हालाही प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केल्यावर त्यांना जिल्हा बंदीचे कारण पुढे करून किनाऱ्यावर उतरविण्यास मनाई करण्यात आली. या मच्छीमार मजुरांनी एक रात्र काढून उद्या निघून जाण्यास सांगताच रविवारी (ता.5) रात्री साडे अकराच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराचा वापर करावा लागला. 

वेरावळ येथून उंबरगाव बंदरात आलेल्या 2700 खलाशी मजुरांपैकी महाराष्ट्रातील मजूर किती होते व किती मजुरांना परत पाठवले, याबाबत गुजरात प्रशासनाने डहाणू व तलासरी तालुक्‍याच्या तहसीलदारांना कोणतीही अधिकृत माहिती किंवा आकडेवारी दिलेली नाही. 
- राहुल सारंग
, तहसीलदार, डहाणू. 

गुजरात राज्यात समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार मजुरांची उपासमार होणार नाही, तसेच वेळप्रसंगी वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था करण्यासाठी गुजरात राज्याचे मच्छीमार कृती समितीचे प्रमुख तुलसीदास गोहिल यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊन असेपर्यंत या मजुरांना घरी पाठवण्याची घाई करू नये, अशाही सूचना दिल्या असून सर्व मच्छीमार मजुरांना सुखरूपपणे घरी आणण्याची जबाबदारी मच्छीमार कृती समिती पार पडेल. 
- रामकृष्ण तांडेल,
कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com