
रिक्षा भाडे वाढ मिळावी व परमिट बंद करा आदी मागण्यांसाठी 31 जुलै ला मध्यरात्री पासून कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाने बंद पुकारला आहे.
कल्याण डोंबिवलीत रिक्षा बंद नाही; 11 रिक्षा संघटनांचा संपात सहभाग नाही
डोंबिवली - रिक्षा भाडे वाढ मिळावी व परमिट बंद करा आदी मागण्यांसाठी 31 जुलैला मध्यरात्री पासून कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाने बंद पुकारला आहे. कल्याण डोंबिवलीतील 11 रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याने रिक्षा या सुरूच राहणार आहेत. राज्य सरकारकडे रिक्षाचालकांच्या मागण्या प्रलंबित असताना सामान्य प्रवाशांना वेठीस का धरायचे?, असा सवाल करत आंदोलन न करण्याचा भूमिका रिक्षा संघटनांनी मांडली आहे.
कोकण विभागातील रिक्षा संघटनांनी 1 ऑगस्टपासून पुकारलेल्या रिक्षा बंद आंदोलनात डोंबिवलीच्या 5 व कल्याणच्या 6 रिक्षा संघटना सहभागी होणार नाहीत अशी माहिती भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिली. डोंबिवलीतील महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना, रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, भाजपा प्रणित रिक्षा चालक मालक संघटना, लालबावटा रिक्षा चालक मालक संघटना, एकता रिक्षा चालक मालक संघटना यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या सावटानंतर आता रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्यामुळे ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले आहेत. बँकेने कोरोनाकाळात रिक्षाचालकांना दिलेली व्याजमाफी फसवी ठरली आहे, असे माळेकर म्हणाले. एका वित्त कंपनीने व्याजावर व्याज लावून रिक्षा जप्त करण्याचे प्रकार केले. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. बंद मुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आमचा यात सहभाग नसेल असे देखील ते म्हणाले.
यामुळे कल्याण डोंबिवलीतील 90 टक्के रिक्षा या सुरू राहणार असून या बंदचा फटका नागरिकांना बसणार नाही असेही माळेकर म्हणाले.
Web Title: Rickshaws Are Not Closed In Kalyan Dombivali 11 Rickshaw Associations Are Not Participating In Strike
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..