भयाण वास्तव ! मरण झाले स्वस्त, अंत्यविधी महागला; कार्याला येतोय तब्बल 'इतके' हजार रुपये खर्च

भयाण वास्तव ! मरण झाले स्वस्त, अंत्यविधी महागला; कार्याला येतोय तब्बल 'इतके' हजार रुपये खर्च

मुंबई : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून आता कोरोनाचं भयाण वास्तव समोर यायला सुरवात झालीये. आता मरणानंतर करण्यात येणारा अंत्यविधी देखील महागला आहे. कोरोनापूर्व काळात 10 ते 12 हजाराच्या होणारा अंत्यविधीचा खर्च आता 30 हजारांच्याही वर पोहोचला आहे.

वरळी येथे राहणाऱ्या तसेच औषधाच्या  दुकानात काम करणाऱ्या संदेश गिरकर  या तरुणाच्या कोरोनाग्रस्त 60 वर्षीय वडिलांनी केईएम रुग्णालयात 27 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात असतांना वडीलांसाठी त्यांच्या मुलासह कुटुंबाची फारच धावपळ झाली. अखेर वडिलांचा अंत्यविधी तरी व्यवस्थित पार पाडावा अशी कुटुंबियांची इच्छा होती. रुग्णालयातून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील शिवाजी पार्क स्मशानभूमीत वडिलांचे अंत्यसंस्कार करायचे होते. वडिलांचे शव नेण्यासाठी रुग्णवाहिकेची शोधाशोध सुरू झाली. 

रुग्णालयाच्या आसपास रुग्णवाहिकांचा शोध घेतला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. एक रुग्णवाहिका तासाभरात उपलब्ध होणार होती. तिच्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्याने 12 हजार रुपये दर सांगितला. चालकाला सर्व परिस्थितीची माहिती दिली. त्याने 2 हजार रुपये कमी केले मात्र रुग्णवाहिका एकट्यालाच मॅनेज करावी लागते, रुग्णवाहिकेवरील क्लिनरही यायला तयार नाही, पीपीई किटचा खर्च, गाडी सॅनिटायीझ करण्याचा खर्च, पेट्रोल-डिझेल हा सर्व खर्च आम्हाला करावा लागत असल्याचे रुग्णवाहिका चालकाचे म्हणणे होते. अधिक घासाघीस करण्याची वेळ नसल्याने 10 हजाराच्या रुग्णवाहिका ठरवल्याचे गिरकर यांनी सांगितले.

वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने त्याच दिवशी अंत्यविधी नातेवाईकांसह धार्मिक पद्धतीने करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही अंत्यविधी उरकून बाकी सर्व धार्मिक संस्कार नंतर करण्याचे ठरवले. त्यासाठी विधिकर्त्यांशी संपर्क केला. अंत्यसंस्काराच्या दिवशी भडाग्नीचा विधी नंतर दिवशी करता येत असल्याचे सांगितले. अंत्यविधीसाठी तीन दिवसांच्या कार्यासाठी 3 ते 4 हजार रुपये खर्च सांगितला. मात्र आम्ही बाराव्या पर्यंतचे सर्व विधी करण्याचे ठरवले. मात्र त्यासाठी आवश्यक साहित्यासह साधारणता 22 हजार रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याचे गिरकर यांनी सांगितले.

कोरोना काळात भटजी मिळणे देखील कठीण झालंय. त्यामुळे जे भटजी मिळतील त्यांच्याकडून विधी केल्या जातात. आम्ही ही तेच केले. अशी परिस्थिती सगळीकडेच आहे. काही ओळखीच्या कुटुंबातील व्यक्तींचे देखील कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत त्यांना देखील साधारणता 30 ते 35 हजार रुपये खर्च आल्याचे गिरकर यांनी सांगितले.

सध्या कोरोना काळ असल्याने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी फारसे बोलावणे होत नाही. मात्र दिवसातून एक ते दोन अंत्यविधीसाठी बोलवणे होत असल्याचे मनोज जोशी या भटजींनी सांगितले. एखाद्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल तर शासनाने बंदी घातल्यामुळे आम्ही स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जात नाही, मात्र भडाग्नीचा विधी आम्ही नंतर 7 व्या किंवा 9व्या दिवशी करत असल्याचे ही त्यांनी सांगितले. अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य आम्ही स्वता घेऊन येतो त्याचा खर्च, 12 व्या पर्यंतचे सर्व विधी तसेच आमची दक्षिणा असे मिळून 20 ते 22 हजार रुपये इतका येत असून केवळ कोरोना काळातच नाही तर त्यापूर्वी देखील इतकाच खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल ) 

sad but true reality of corona where your life is cheaper than the death

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com