
Sanjay Raut : मी एकटा वाघ, सुरक्षेची गरज नाही - संजय राऊत
Sanjay Raut : श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षातील सर्व नेत्यांची सुरक्षा काढली गेली. सत्तेवरील नेते, आमदार आणि खासदार धमकीची भाषा वापरत आहेत. कट फक्त माझ्या बरोबर नाहीत तर अजूनही काही गोष्टी उघड होतील. त्यामुळे राज्यातील परिस्थिती नेमकी काय आहे, याबाबत अवगत करण्यासाठी मी गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले. सुरक्षेची मागणी मी केली नाही. मी एकटा वाघ आहे मला सुरक्षेची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, या राज्याचे अती बुद्धीमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मी पत्र पाठवले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील जामीनावर सुटलेले राजा ठाकूर या गुंडाला माझी सुपारी देण्यात आली आहे. ही माहिती माझ्यापर्यंत आली आहे. सरकार बदलल्यापासून लोकप्रतिनिधींची सुरक्षा धोक्यात आली आहे.
ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणतात, "गेली ४० वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणासोबत पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात आणि तसे प्रयत्नही झाले. मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरित्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकू व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे."