मुंबईत कोरोनाचा दुसरा उद्रेक, शहरात समूह संसर्गाची भीती

मुंबईत कोरोनाचा दुसरा उद्रेक, शहरात समूह संसर्गाची भीती

मुंबई, 19: मुंबईसह अनेक ठिकाणी अनलॉक केल्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा बाहेर फिरु लागले आहेत. मात्र, याचा परिणाम मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या निश्चितच झालेला पाहायला मिळतो. दरम्यान, मुंबईसह अनेक ठिकाणी वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाचा दुसरा उद्रेक असल्याचे स्पष्ट संकेत देत असल्याचे वैद्यकीय तद्यांचे मत आहे. यात सर्वात जास्त मुंबईकरांचा बेफिकीर पणा कारणीभूत असल्याचे ही तज्ज्ञ सांगतात. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डीस्टस्टींग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर हाच एकमेव पर्याय असताना मुंबईकर बेफिकीरपणे मास्क न लावता रस्त्यांवरुन गर्दी करत आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर ही संख्या वाढू लागली ती आतापर्यंत कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार विनाकारण घराबाहेर पडू नका, किंवा मास्कचा वापर करा असे आवाहन करुनही त्या आवाहनाकडे मुंबईकरांनी दुर्लक्ष करत रुग्णसंख्या वाढण्यास मदतच केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

मुंबईत कोरोना रुग्णसंख्यावाढीचा दर 1.24 टक्के एवढा आहे. तर, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून 20 हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडत असल्याने महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. या वाढलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता बेड्सही कमी पडू लागले आहेत. शिवाय, झोपडपट्टी परिसरात आणि चाळींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता इमारतींमध्ये ही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे, त्यांना होम आयसोलेशन हा देखील पर्याय उपयुक्त ठरू शकतो. 

कोरोनाचा दुसरा उद्रेक? 

मुंबईत कोरोना कमी झालाच नव्हता. काही दिवसांपूर्वी थोडा रोगाचा प्रसार कमी झाला होता. मात्र, मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक झाला असं म्हणता येईल कारण रूग्णसंख्या अचानक वाढली आहे. ॲंटिजेन चाचण्या वाढवल्यामुळे आणि मुंबईकरांच्या बेफिकीरपणामुळे कोरोनाची लाट वाढण्यास मदत झाली आहे. त्यातही गंभीर रुग्णांची संख्या तितकीशी वाढली नाही आणि मृत्युदरही आटोक्यात आहे. पण प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे मुंबईत मास्क न वापरणे, कारणाशिवाय कुठेही फिरणे ही आहेत. मे महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जास्त रुग्ण वाढले. ॲंटिजेन चाचण्यांसाठी कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचा ही हा परिणाम असू शकतो. कोरोनाबाबतची भीती कमी झाली आहे असं  कोरोना मृत्यू निरीक्षण समिती सदस्य डाॅ. अविनाश सुपे यांनी म्हटलंय,

मुंबईकरांनी शिस्त आणि नियम पाळणे गरजेचे -

गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही कोविड केंद्रामध्ये काम करत आहोत. पण, नशिबाने आमच्याकडे अजून एकही डाॅक्टर पाॅझिटीव्ह आलेला नाही. त्यामुळे, काळजी घ्यायची हे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांच्या मनातील भीती कमी झाली असून बेदखल झाले आहेत.

त्यामुळे, मुंबईकरांनी शिस्त आणि नियम पाळणे गरजेचे आहे. कारण, प्रत्येकाच्या घरी कोणीतरी ज्येष्ठ नागरिक असेल. मास्कशिवाय लोक सर्रास चालताना दिसतात. बोलताना तो मास्क नाकावरुन खाली आलेला असतो. अनलॉकला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे, स्वतः ची काळजी आणि स्वच्छता ही राखलीच पाहिजे. रुग्णांच्या सुविधांसाठी आणखी रुग्णालये वाढवली पाहिजेत.

सुरुवातीला 400 रुग्ण एका दिवसात येत होते. मधल्या काळात ते कमी होऊन 200 किंवा त्याहून कमी येत होते. मात्र, आता सर्व बेड्स फुल झाले आहेत. आयसीयू ही फुल्ल आहेत. आता 120 हून अधिक रुग्ण एका दिवशी आढळत आहेत असं, वरळीत एनएससीआय डोमचे  प्रमुख नीता वर्टी यांनी सांगितलं

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 20 पटीने वाढण्याची गरज 

ही कोरोनाची दुसरी लाट म्हणता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं जर आपण काळजी घेतली नाही तर कोरोनाची दुसरी लाट येईल. जी रुग्णसंख्या कमी झाल्याची आकडेवारी होती ती कौशल्याने बनवलेल्यासारखी वाटत होती. टेस्ट कमी केल्यामुळे रुग्णसंख्या ही कमी दिसत होती. 4 ते 6 हजाराच्या वर टेस्ट होत नव्हत्या आणि चौथ्या पाचव्या दिवशीच रुग्णांची लक्षणे कमी दिसली की त्यांना डिस्चार्ज देण्यात येत होता.

आयुक्तांनी आदेश दिला होता की रोज 25% रुग्ण डिस्चार्ज झालेच पाहिजेत. रुग्णांची आवक कमी करायची त्यामुळे ऍक्टिव्ह केसेस कमी राहतात त्यामुळे रुग्णसंख्या कमी झालेला आकडा हा बनवलेला असावा अशी शंका आहे. रस्त्याने येताना लोक खूप गर्दी करत आहेत, मास्क तोंडावर लावण्याऐवजी गळ्यात घालून फिरतायत, एकमेकांना भेटत आहेत, चहाची दुकाने, पान सुपारीची दुकाने यावर सर्रास गर्दी दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात गर्दी वाढली त्यामुळे हा फटका आहे.

लोकांचा बेफिकीरपणा याचा हा परिणाम आहे. एका पॉझिटीव्ह केस मागे 20 कॉन्टॅक्ट ट्रेंसिन्ग टेस्ट झाली पाहिजे. कारण ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत असे रुग्ण कॉन्टॅक्टद्वारे संसर्ग पसरवतात. आयसीएमआरने 11 सप्टेंबरला एक सर्क्युलर काढले आहे त्यामध्ये असे दिसून आले की, एक पॉझिटिव्ह रुग्ण सरासरी 80 ते 130 लोकांना संसर्ग पसरवू शकतो. त्यामुळे एक पॉझिटिव्ह रुग्ण निघाला की त्यामागे 80 तरी टेस्ट झाल्या पाहिजेत.

जर मुंबईत एका दिवशी 2500 नवीन रुग्ण आढळले तर त्यांचा गुणाकार होऊन किमान 50,000 टेस्ट होणे गरजेचे आहे. टेस्टचा आकडाही जो वाढला आहे त्या पटीने टेस्ट होत नाही. त्यामुळे, ही समूह संसर्गाकडे वाटचाल आहे हे ही सरकार मान्य करत नाही आहे असंही इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे म्हणालेत. 

मुंबईत समूह संसर्ग -

मुंबईत निश्चितच समूह संसर्ग झाला आहे. मुंबईतील कोरोनाचा आकडा हा कधीच कमी झाला नाही. दुसरी लाट आपण तेव्हा म्हणू जेव्हा रुग्णसंख्या पूर्णपणे कमी होऊन पुन्हा झपाट्याने वाढेल. आता वाढलेली रुग्णसंख्या ही चिंता निर्माण करणारी आहे. कारण, या रुग्णांना बेड्स उपलब्ध करुन त्यांच्यावर उपचार होणे हे मुख्य उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. योग्य वेळी उपचार हाच त्यावरील पर्याय आहे. आता इमारती आणि सोसायटीतून रुग्ण समोर येत आहेत. त्यांच्यासाठी होम आयसोलेशन हा देखील पर्याय आहे. असं  महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे महाराष्ट्र अध्यक्ष डाॅ. शिवकुमार उत्तुरे म्हणालेत.

भारत कोरोनाच्या तिसर्या टप्प्यात-

आपण आता दुसरा टप्पा पार केलेला आहे आणि आता आपण तिसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. 50 लाख रुग्णांचा टप्पा आपण पार केलेला आहे ज्यामुळे सध्या कोरोना रुग्णसंख्येत जगात दुसऱ्या नंबरवर आहोत. लाॅकडाऊन उठवल्यामुळे लोक बेफिकीर झाले आहेत. त्यांना असे वाटत आहे की लॉकडाऊन उठवले म्हणजे कोरोना संपला. जे बरोबर नाही आहे. दिल्लीमध्ये आयसीएमआरने ही हे मान्य केलं आहे की आपण सामूहिक संसर्गाकडे चाललेलो आहोत. आता दोन गोष्टी आपल्याला वाचवू शकतात एक तर कोरोनावरची लस किंवा लोकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे.

लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी झालेली आहे. लोक मास्क वापरत नाहीत कसलेही तारतम्य बाळगत नाहीत. सरकारने छोटे दवाखाने बंद केले आहेत आणि सर्व ताण मोठ्या रुग्णालयावर आला आहे. याला आळा घालण्यासाठी सरकाने कडक अंमलबजावणी केली पाहिजे. लोकांना मास्क घालण्यास प्रवृत्त केले पाहिजे आणि जे नियम नाही पाळत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि शक्य झाल्यास पुन्हा एकदा टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन लावले पाहिजे. गणपती उत्सवामध्ये खरेदीच्या निमित्ताने गर्दी करण्यात आली होती, सणावाराला अशी गर्दी करणे टाळले पाहिजे. वुहान मधून आलेला विषाणू हा विषाणू नैसर्गिक वाटत नाही. हा माणसाने बनवलेला विषाणू आहे आणि तो अशा तापमान बदलामुळे जाईल याची शक्यता दिसून येत नाही, असं मत IMA चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. अनिल पाचणेकर यांनी व्यक्त केलंय. 

( संपादन - सुमित बागुल )

second wave of covid 19 might com in mumbai because of citizens careless behavior

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com