मोदी सरकारच्या निर्णयाचं शरद पवारांनी केलं स्वागत

Sharad-Pawar-PM-Modi
Sharad-Pawar-PM-Modi

मुंबई: भारत सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय पद्धतीने स्वातंत्र्य दिवसाची ७५ वर्षे साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वागत केले. भारत देश १५ ऑगस्ट २०२२ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. २०२२ साली भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या दिवसाच्या ७५ आठवडे आधी म्हणजेच आज (१२ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष साजरं करण्याच्या दृष्टीने 'आझादी का अमृत महोत्सव' (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव) या कार्यक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमातंर्गत होणाऱ्या कार्यक्रमाची संकल्पना ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या ७५ आठवडे आधी सुरू करण्याच्या कल्पनेबाबतबही शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला.

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'च्या संबंधित सर्व कार्यक्रमांचे भारताच्या सर्व राज्यात आणि संघ राज्याच्या क्षेत्रामध्येसुध्दा आयोजन केले जाणार आहे. साबरमती आश्रमापासून या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार हे ७५ आठवडे साजरे करणार आहेत. आपल्या देशाची मान उंचावणाऱ्या या महोत्सवात मला सहभागी होण्याचे भाग्य मिळणार आहे याचा मला अभिमान आहे, अशा भावना शरद पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडल्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यासोबतच 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अभियानाला शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

असा असेल अमृत महोत्सवी कार्यक्रम- स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त होणाऱ्या अमृत महोत्सवाला महात्मा गांधींच्या ऐतिहासिक दांडीयात्रेच्या स्मृतीदिनी प्रारंभ होत आहे. स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ ला ७५ वर्षे पूर्ण होणार असली तरी अमृत महोत्सव कार्यक्रम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपर्यंत म्हणजेच ऑगस्ट २०२३ पर्यंत घेण्याचे नियोजनही सरकारने केले आहे. दांडी यात्रेच्या धर्तीवर मोदी सरकारचे मंत्री देखील पदयात्रा काढणार आहेत. यानिमित्ताने देशभरात सर्व राज्यांमध्ये आगामी ७५ आठवडे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. महाराष्ट्रात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान आणि आगाखान पॅलेसच्या वास्तूत कार्यक्रम घेतले जातील. याखेरीज पुण्यातील आगाखान पॅलेस आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. महात्मा गांधीजींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहासाठी गांधीजींनी काढलेल्या ऐतिहासिक दांडी यात्रेच्या स्मृतीचे निमित्त साधून सांस्कृतिक कार्यमंत्री प्रल्हाद पटेल हे साबरमती ते नडीयाद अशी ७५ किलोमीटरची पदयात्रादेखील काढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com