
गेले पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करणारे आणि उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणारे एसटी कर्मचारी आंदोलक काल अचानक आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हिंसक आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी व चप्पलफेक दगडफेक देखील झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन नसून पवारांच्या झालेला हल्ला होता.
या घटनेवर राज्यभरातून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. काहीजणांनी अप्रत्यक्षपणे या घटनेचं समर्थन देखील केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवारांच्या घरावर चप्पलफेक आंदोलनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रात आजवर अशा घटना घडल्या आहेत तेव्हा आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेते एकत्र येत होते हा इतिहास आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण संपूर्ण देशभरासाठी आदर्श ठरणारे होते.
साधारण ४०-५० वर्षांपूर्वी पवारांच्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग याचीच साक्ष देतो.
तरुण शरद पवार तेव्हा पहिल्यांदाच राज्याचे गृहखात्याचे राज्यमंत्री बनले होते. पुण्यात मंडईच्या गणपतीची विटंबना झाल्यानं दंगल उसळली होती. गृहराज्यमंत्री असल्यामुळे आणि पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पवारांनी या घटनेकडे तातडीने लक्ष देणे साहजिक होते. त्यांनी मुंबईतून थेट पुण्याला धाव घेतली. दंगल लवकरातल्या आटोक्यात आणणे ही प्राथमिकता होती. पवारांनी स्वतः दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. स्वतः मंत्रीमहोदय दंगलग्रस्त भागात जाणार ही धाडसी गोष्ट होती. पोलिसखात्याने पवारांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या मतावर ठाम होते.
अखेर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पवारांना दंगलग्रस्त भागाचा दौरा करताना एस. एम. ना बरोबर घेण्याची विनंती केली.
एस.एम.जोशी महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यलढा असो गोवा मुक्तीसंग्राम असो किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ समाजवादी विचारसरणीच्या एस एम जोशींनी अनेक आंदोलनाचे आघाडीवर राहून नेतृत्व केलं होतं. साधेपणा व स्वच्छ चारित्र्य ही त्यांची ओळख होती. सत्तास्थानांची कित्येक प्रलोभने असूनही त्यांनी आपली हयात विरोधी पक्षात घालवली होती. याच कारणांमुळे एस एम जोशींच्या बद्दल सगळी कडे एक आदरयुक्त दरारा होता.
एस एम जोशी पुण्याचेच असल्यामुळे आयुक्तांनी पवारांना दंगलग्रस्त भागाचा दौरा करताना त्यांना सोबत नेण्याची विनंती केली होती.
गृहराज्यमंत्री शरद पवार आणि एस एम जोशींना सोबत घेऊन पुण्याच्या पेठांची पाहणी करण्यास निघाले. पण वातावरण एवढं प्रक्षोभक होतं, की ते दंगलग्रस्त भागाचा दौरा करत असतानाही दगडफेक सुरू होती. गणेश पेठेतल्या डुल्या मारुती चौकात जेव्हा ते पोहचले, तेव्हा एक हिंस्र जमाव अचानक समोर आला. हा जमाव जाळपोळीची भाषा करीत होता.
वातावरण अतिशय तंग बनलं. काहीही घडू शकेल अशीच परिस्थिती होती. खुद्द गृहराज्यमंत्री या ठिकाणी उपस्थितीत होते. जमाव इतका क्रुद्ध होता की पवारांवरही हल्ला होण्याची व त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली. या जमावापुढे पोलिसांचं बळ अतिशय अपुरं होतं. या आणिबाणीच्या प्रसंगी एस. एम. सरळ गाडीतून उतरले आणि ‘आधी मला पेटवा' असं म्हणत जमावात घुसले.
आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात तेव्हाच्या घटनेचा उल्लेख करताना शरद पवार सांगतात, एस एम जोशी यांचं ते धैर्य विलक्षण होतं. एस. एम. यांचं नैतिक वजन असल्यानं जमाव थांबला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या त्या सामर्थ्याचा अनुभव मी घेतला. त्यातून एस. एम. यांच्याविषयीचा आदर अधिकच वृद्धिंगत झाला.
विरोधी पक्षाच्या नेत्याने दंगलीत मंत्र्यांचा जीव वाचवण्याची ही घटना देशाच्या राजकारणात दुर्मिळ व आदर्शवादी अशीच म्हणावी लागेल. सध्या सुरु असलेल्या धुमाकुळीत अशा प्रसंगाची आठवण नक्कीच होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.