
Warishe Murder Case: पत्रकाराच्या हत्या प्रकरणाचा तपास SIT मार्फत होणार, फडणवीसांची घोषणा
Warishe Murder Case : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. याप्रकरणावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे तसेच स्थानिक पातळीवरही या घटनेवरुन संताप व्यक्त केला जात असल्यानं सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
पत्रकार वारिशे हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राज्यभरातील पत्रकारांनी राज्य सरकारकडं केली आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यभरातील पत्रकारांसह, वारिशे कुटुंबिय आणि शिवसेनेनं यासंदर्भात फडणवीस यांना पत्र लिहिलं असून यातून गंभीर आरोपही केले आहेत. या प्रकरणामुळं राज्य सरकारवर तातडीनं पावलं उचलण्यासाठी दबाव वाढत होता. यापार्श्वभूमीवर पोलिसांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, फडणवीस यांनी एसआयटीचे आदेश दिल्यानंतर लवकरच एसआयटी स्थापन होऊन प्रत्यक्ष तपासाला सुरुवात होईल. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा तपास होणार आहे. यासंदर्भात कालच गृहमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं होतं.