'ऑपरेशन कमळ' चा शिवसेनेकडून खरपूस समाचार, राणेंना दिली 'ही' उपमा

'ऑपरेशन कमळ' चा शिवसेनेकडून खरपूस समाचार, राणेंना दिली 'ही' उपमा

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपच्या 'ऑपरेशन कमळ' वर निशाणा साधण्यात आला आहे. तर भाजप खासदार नारायण राणे यांनी भोंदू डॉक्टरांची उपमा दिली आहे. राणे यांनी  महाराष्ट्र सरकार सप्टेंबरपर्यंत पडण्याचं भाकित वर्तवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 

आजच्या अग्रलेखात राजस्थानमधील 'ऑपरेशन कमळ' फसलं. त्यावरून सेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याची टीका शिवसेनेने भाजपवर केलीय. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे, अशा शब्दात अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.

‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. “सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा” या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करण्यात आले होते. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करुन भाजपला धडा दिला, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले आणि फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे.

शिवसेनेच्या अग्रलेखात काय म्हटलं

बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो. सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही.

सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी यांनी केले आहे.

पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱया नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण?

महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता? भाजपवाल्यांना तर झारखंडचे सरकारही पाडायचे आहे, पण त्यांना ते अजून तरी जमलेले नाही. राष्ट्रापुढील सर्व प्रश्न जणू संपले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मन रमवण्याचे उद्योग सुरू आहेत.

महाराष्ट्र असो की राजस्थान, पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय?

बिहारमध्ये ‘विकास’ हा मुद्दा साफ खड्ड्यात गेल्याने मुंबईतील सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकीय गुजराण सुरू झाली आहे. खरे तर यांच्यापेक्षा विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत नाही की सहकार्याची भावना नाही. म्हणूनच राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले.

shivsena saamana editioral attack on bjp operation lotus rajasthan narayan rane 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com