सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली, शिवसेनेकडून जया बच्चन यांची पाठराखण

सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली, शिवसेनेकडून जया बच्चन यांची पाठराखण

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांची पाठराखण करण्यात आली आहे. त्यासोबतच बॉलिवूडला बदनाम करणाऱ्या लोकांवरही सडकून टीका केली आहे. खासदार जया बच्चन यांनी काल राज्यसभेत आवाज उठवला आणि बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर टीका देखील केली. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. आज शिवसेनेनं देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

हिंदी सिनेसृष्टीचा लौकिक जागतिक स्तरावर आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने बॉलिवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती आहेत, तसे नीरव मोदी, मल्ल्याही आहेत. बॉलिवूडचंही तसंच आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं बॉलिवूडला बदनाम करणाऱ्या मंडळींवर हल्लाबोल केला आहे. 

सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण केली आणि कंगना राणावतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर बॉलिवूडवर बरेच आरोप प्रत्यारोप सुरु आहे. आता याच विरोधात काल जया बच्चन यांनी राज्यसभेत आवाज उठवला आणि बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर टीका देखील केली. 

काय आहे अग्रलेखात 

  • सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी जया बच्चन यांची बिजली कडाडली आहे. 
  • हिंदुस्थानी सिनेसृष्टीस एक परंपरा आणि इतिहास आहे. या मायानगरीत जसे ‘मायावी’ लोक आले आणि गेले तसे अनेक संतसज्जनही होतेच. हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया रचणारे दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचेच होते. त्यांनी मोठ्या कष्टातून या साम्राज्याचे तोरण बांधले. एकापेक्षा एक सरस कलाकारांचे योगदान हिंदी सिनेसृष्टीला आहे. पडद्याचे बॉक्स ऑफिस खुळखुळत ठेवायला आमिर, शाहरुख, सलमान अशा ‘खान’ मंडळींची मदत झालीच आहे. हे सर्व लोक फक्त गटारातच लोळत होते व ड्रग्ज घेत होते असा दावा कोणी करत असेल तर बकवास करणाऱ्यांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे. 
  • आमचे सिने कलाकार सामाजिक दायित्वही पार पाडीत असतात. युद्धकाळात सुनील दत्त व त्यांचे सहकारी सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोरंजन करीत असत. मनोज कुमारने सदैव ‘राष्ट्रीय’ भावनेनेच चित्रपट निर्मिती केली. अनेक कलाकार संकटसमयी खिशात हात घालून मदत करीत असतात. राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटात सामाजिक दृष्टिकोन, समाजवाद याची ठिणगी दिसत होतीच. आमिर खानचे चित्रपटही आज त्याच चौकटीचे आहेत. हे सर्व लोक नशेत धूत होऊन हे राष्ट्रीय कार्य करीत आहेत. अशा गुळण्या टाकणे हा देशाचाच अवमान आहे.

Shivsena saamana editorial support jaya bachcha attack kangana ranaut

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com