
"सरकारने अशा घुबडांची काळजी न करता..."; संजय राऊतांचा संताप
"अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही"
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर भगवा फडकवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्या आदेशाला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला होता. त्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. "भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आणि प्रतिष्ठा आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे नतद्रष्ट आहेत. अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहिल, अशी कार्यवाही सरकारने त्या लोकांवर करावी", अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Shivsena Sanjay Raut angry on Adv Gunaratna Sadavarte over Saffron Flag in govt offices)
"भगवा झेंडा शासकीय कार्यालयावर फडकवणे हे आपलं साऱ्यांचं स्वप्न आहे. भगवा झेंडा फडकवल्याने तिरंग्याचा अपमान होण्याचा प्रश्नच नाही. भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्यलढ्यात लढू शकला. वीर सावरकरांपासून ते भगतसिंह, सुखदेव, राजगुरूंपर्यंत सर्वांच्या पाठीशी भगव्याची प्रेरणा होती. ज्यांना भगव्याचं महत्त्व कळत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही", असे राऊत म्हणाले.
खेडच्या विषयाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, "खेडमध्ये घडलेला विषय हा केवळ खेडपुरता मर्यादित आहे. खेडमधील आमचे सदस्य यांना इतर पक्षाकडून आमिष दाखविण्यात आले आणि त्यांना तसं कळविण्यात आलं. याचा अजित पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांशी काही संबंध नाही. हे राजकारण खालच्या स्तरावरच्या नेत्यांनी घडवून आणलं गेलं होतं. आपण महाविकास आघाडीत आहोत. दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवक आणण्याविषयी निर्णय घेताना त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे असं आमचं आहे. जर तुम्ही तो नियम मोडत असाल, तर मग तो अधिकार आम्हालादेखील आहे", असा इशारा राऊत यांनी दिला.
पुणे महापालिका निवडणूक
"पुणे महापालिका निवडणुकीत १६४ जागा असून शिवसेनेने एकीकडे स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांशी युती झाल्यास ८० जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा आपल्याला उपयोग करून घेत निवडणूक जिंकता आल्या पाहिजेत. त्यादृष्टीने तयारी करा", असे बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.