रायगडमध्ये होऊ शकते महाड इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती; जिल्ह्यात तब्बल इतक्या इमारती धोकादायक

रायगडमध्ये होऊ शकते महाड इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती; जिल्ह्यात तब्बल इतक्या इमारती धोकादायक

अलिबाग : रायगड जिल्हयामध्ये 535 इमारती धोकादायक आहेत. यातील काही इमारतींमध्ये आजही काही नागरिक राहत असल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.  प्रशासनाकडून वेळोवेळी नोटीसा बाजवल्या जातात. मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरत आहे. महाड येथील इमारत दुर्घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 

रायगड जिल्हयात वेगवेगळया प्रकारचे एक हजारहून अधिक कारखाने असल्याने याठिकाणी लोकवस्तीदेखील वाढत आहे. जिल्हयात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकीकरणामुळे जिल्हयात  इमारतींची संख्याही  वाढू लागली आहे. अलिबाग, पनवेल, कर्जत, उरण हे तालुके मुंबई पासून अगदी जवळ असल्याने या ठिकाणीदेखील मोठ मोठ्या इमारतीचे जाळे पसरू लागले आहे. त्यात खालापूर, माणगाव, महाड, रोहा या तालुक्यात ही इमारती वाढू लागल्या आहेत.  मोठ मोठ्या इमारती वाढत असल्या तरीही काही इमारतींचे निकृष्ठ दर्जाचे काम असल्याने त्या इमारती पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते.  

जिल्हयामध्ये नगरपालिका व नगरपंचायत हद्दीत 535 इमारती धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. त्यात 36 इमारती अतिधोकादायक असून 34 खासगी व दोन शासकिय इमारतींचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच 499 धोकादायक असून त्यात 8 शासकिय व 491 खासगी इमारतींचा समावेश आहे. या इमारती धोकादायक असतानाही नगरपंचायत व नगरपालिकांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. फक्त पावसाच्या कालावधीत अतिवृष्टी, वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास इमारत पडून कोणतीही जिवीतहानी होऊ नये यासाठी फक्त त्या कालावधी पुरता इमारतीमधील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले जाते. तसेच इमारतीमधील नागरिकांना नोटीसा बजावण्याचे काम केले जाते. प्रत्यक्षात मात्र या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरत आहे.  महाड येथे सोमवारी सायंकाळी आठ वर्षापुर्वीची इमारत कोसळली. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस पावले 
उचलण्याची गरज आहे.

धोकादायक इमारतीची माहिती पावसाळ्यापुर्वी घेऊन तेथील नागरिकांना याची माहिती नोटीसी द्वारे दिली जाते. ज्या इमारती पडायला आल्या आहेत. तेथील नागरिकांना अन्य ठिकाणी जाण्याचे आवाहनही प्रशासनामार्फत केले जाते. परंतू काही कारणामुळे ही मंडळी इमारत सोडण्यास तयार नसतात. 
 

महेश चौधरी
- मुख्याधिकारी , अलिबाग नगरपरिषद

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com