कोरोना काळात  'या' इंडस्ट्रीला तब्बल ४ हजार कोटींचा फटका, व्यवसायाचे कंबरडे मोडले

कोरोना काळात  'या' इंडस्ट्रीला तब्बल ४ हजार कोटींचा फटका, व्यवसायाचे कंबरडे मोडले

मुंबई: वाजंत्रींचा ताफा, संगीताच्या तालावर थिरकणारे  नातेवाईक, घोड्यावर बसलेला नवरा, त्याच्याबरोबर वऱ्हाडी मंडळी. क्षणाक्षणाला फोटोशूट, फुलांची उधळण, असे लग्नातील दृश्य आता पाहायला मिळत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांनुसार लग्नात फक्त 50 जणच उपस्थित राहू शकतात. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबईतील अनेक सभागृहे, हॉलवर धडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनेक जोडप्यांनी मार्च ते मे महिन्यात थाटामाटात लग्न करण्याचा विचारच रद्द केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेला तोटा कसाबसा भरुन निघत असताना, दुसऱ्या टप्प्याच्या नियमांमुळे लग्न, कॅटरींग व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. त्यासोबत  लग्न समारंभावर अवलंबून असलेल्या हजारोंचा रोजगार पुन्हा बुडण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शासनाने कडक नियमावली लागू केली आहे. मर्यादित वेळेत बाजारपेठ,हॉटेल, रेस्टॉरंट खुले करायचे, असे निर्देश देण्यात आले आहेत. लग्नात 50 माणसांची परवानगी देण्यात आली आहेत. त्यामुळे लग्न समारंभ मोठ्या उत्सवात साजरा करणाऱ्यांनाच हिरमोड झाला आहे. यासह लग्न समारंभ व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाहून जातील, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षापासून कॅटरर्स, डेकोरेटर, ज्वेलर्स, ब्युटिशियन, म्युझिक बँड, फोटोग्राफर्स, फॅशन डिझायनर, ट्रान्सपोर्टर्स, विविध सेवा समावेश असलेल्या लग्न समारंभारच्या व्यवसायात अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जवळपास 15 हजार लग्न समारंभ रद्द झाली. पुढील एप्रिल आणि मे मधील बुकिंग झालेली लग्न समारंभ रद्द करावी लागत आहे. या लग्न समारंभ हा मोठा व्यवसाय आहे. यावर  प्रत्यक्ष, अवलंबून असलेल्या ३० हजार कामगारांचा रोजगार बुडाला आहे. मुंबईत साधारण 1300 ते 1600 एसी आणि नॉन एसी हॉल आहेत. तर 100हून अधिक लॉन आहेत. कोरोना आटोक्यात आल्यानंतर हा व्यवसाय कसा बसा तग धरायला लागला होता. मात्र दुसऱ्या टप्पात कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे पालिकेने कोविड नियमावली पुन्हा लागू केली आणि जागावर येत असलेला धंदा अजून बसल्याची भावना अनेक हॉल चालकांनी व्यक्त केली. 
 
डेकोरेशन, कॅटरींगचा व्यवसाय

डेकोरेशन, कॅटरिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. संपूर्ण एक वर्ष नुकसानात गेला आहे. डेकोरेशनमधील सामग्रीचा देखभाल-दुरुस्तीसाठीचा खर्च आता परवडत नाहीत. पूर्वी साधारण 70 ते 80 कामगार काम करण्यासाठी ठेवली होती. मात्र 75 टक्के बुकिंग कमी झाल्याने फक्त 7 ते 10 कामगार काम करत आहेत. बाकी सर्व कामगार गावी निघून गेले आहेत. लग्नासाठी फक्त 50 माणसांची मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे हॉलमध्ये किंवा लॉनमध्ये बुकिंग करण्यापेक्षा लोक हॉटेलमध्ये बुकिंग करतात. त्यामुळे डेकोरेशन, कॅटरिंग व्यवसाय कोलमडला आहे. यासह फोटोग्राफर, फुलवाले, बँडवाले, लाइटिंगवाले हे सर्व व्यवसायधारक बेरोजगार झाले आहेत. सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावे. 5 ते 6 हजार फुटांचा हॉल असेल, तर तिथे 150 ते 200 माणसांना येण्याची परवानगी देण्यात यावी. त्यामुळे 25 ते 30 फुटांच्या अंतराने 1 माणसाला उभा राहू शकतो. यासह प्रत्येकाला सॅनिटायझेर देणे, फवारणी करणे, अशा सुविधा लग्न समारंभात प्रदान केल्या जातील.
सुशील मर्चंड, अध्यक्ष, मुंबई (नॉर्थ-ईस्ट) डेकोरेटर्स अँड हायरेस वेल्फेअर असोसिएशन
 
लग्न समारंभामुळे हजारो हाताना रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांचे पोट भरते. लग्न हॉल, लॉनच्या आकारमानानुसार लोकांना परवानगी दिली जावी. मागील अनेक काळापासून देखभालीचा खर्च, विजेच्या बिलाचा खर्च वाढल्याने व्यवसाय नष्ट होण्याची वेळ आली आहे. सध्या अनेक उद्योगांना शंभर टक्के क्षमतेने कामाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे-बसगाड्या या देखील हल्ली पूर्ण क्षमतेने चालत आहेत. तेथे सॅनिटायझेशन होत नाही आणि अंतराचे-स्वच्छतेचे नियमही पाळले जात नाहीत. याउलट सर्व सभागृहांमध्ये नियमितपणे सॅनिटायझेशन होते. पाहुण्यांची माहिती येथे ठेवली जाऊ शकते. त्यांची काटेकोर तपासणीही होऊ शकते. 
ललित जैन, प्रवक्ते, बाँबे कॅटरर्स असोसिएशन

लग्न समारंभानिमित्त हॉल, लॉनची सजावट करण्यासाठी, हार लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी केली जात होती. मात्र राज्य सरकारच्या नियमांमुळे सर्वजण थोड्याटच भागवून घेत आहेत. त्यामुळे फुल बाजारात 50 टक्के गिऱ्हाईक कमी झाले आहेत. गिऱ्हाईक आता 10 किलो फुले घेण्याऐवजी 2 किलोचा खरेदी करत आहेत. झेंडू, गुलाब, नामधारी, गुलछडी, मोगरा, अष्टर फुलांची व्रिक्री कमी झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात गोंगाट, गोंधळ होता. मात्र, आता फुल मंडईत सुनसान वातावरण तयार झाले आहे. 
दादाभाऊ येणारे, संचालक, माँ साहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई
 
लॉकडाऊनमुळे सर्व काही अस्ताव्यस्त झाले आहे. लग्न समारंभात व्यवसाय चांगला होतो. मात्र, मागील एक वर्षापासून व्यवसाय ठप्प झाला आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य कुठे बाहेर नोकरी नाही. त्यामुळे सध्या हाती मिळेल ते, काम करणे सुरु आहे. पुढील दोन महिन्यात लग्न समारंभात मोठ्या थाटामाटात झाली, तरच पोटाची खळगी भरेल.
विक्की मोरे, कॅटरिंग कर्मचारी

  • वेडींग इंडस्ट्रीचे अर्थकारण बिघडले
  • वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवस लग्न समारंभाचा हंगाम 
  • तो आता फक्त 20 ते 30 दिवसांचा सिझन झाला आहे. 
  • अनलॉकमध्ये नोव्हेंबर ते  जानेवारीत लग्न साधेपणाने झाले 
  • एप्रिल, मे महिन्यातील बुकिंग रद्द होण्याची शक्यता
  • अवंलबून असणारे जवळपास 30 हजार कुशल, अकुशल कामगार बेरोजगारीच्या गर्तेत
  • लग्नसोहळ्यावर अवलंबून असणारे इतर व्यवसाय ठप्प झालेत
  • लॉकडाऊन काळात जवळपास 4 हजार कोटीचा फटका 
  • दुसऱ्या टप्प्याच्या कोविड संसर्गामुळे सावरत असलेला उद्योग बुडतोय

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Special report 4 thousand crore hit the wedding industry during Corona period

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com