

ST Corporation planning collapsed
ESakal
ठाणे शहर : लग्नसोहळा आणि गावखेड्यांत जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्याने एसटीवरील प्रवाशांचा ताण वाढला आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी एसटी प्रशासन अपयशी ठरत आहे. उन्हाळी हंगामात जादा गाड्या सोडूनही वाढीव गाड्या नादुरुस्त असणे, प्रवाशांना न कळवता अचानक बस रद्द करणे असे प्रकार सर्रासपणे घडू लागल्याने प्रवासी आणि चालक, वाहकांमध्ये वाद वाढू लागले आहेत. निर्धारित वेळेत गाड्या सोडणे एसटी प्रशासनाला कठीण झाल्याने ठाणे विभागातील बसचे नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.