ठाणे - हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ व अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्व आहे. त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे जेष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. त्यातच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर दर्शन करण्याचेही प्रत्येकाचे स्वप्न आहे. हिंदू, ख्रिाश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मींयांच्या महत्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो.
जेष्ठ नागरिकांचे संघ 'समूह तीर्थयात्रा' काढण्याचाही विचार करत असतात. त्यांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न आपले सरकार साकार करू शकते. त्यामुळे राज्य सरकारतर्फे धार्मिक न्यास-धर्मस्व विभाग स्थापन करावा आणि त्यातून या यात्रांचे आयोजन करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत देशातील कोणकोणती तीर्थ क्षेत्र समाविष्ट करायची, त्याचबरोबर ट्रेन कशा सुरु करायच्या, एकूणच या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत आपण आदेश देऊन कार्यवाही सुरु करावी. तसेच याच वर्षात ही योजना लागू करावी. असे साकडे ही सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन गेले. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा लाभल्याने ती संतांची पावनभूमी आहे. महाराष्ट्र सरकार अनेक मोठे विकास प्रकल्प राबवत असून महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे.
अशा या संत-वारकरी परंपरा असलेल्या आपल्या राज्यात, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याची सूचना या पत्राद्वारे करत आहे. असे आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे. त्यातच त्यांनी राज्यातील जेष्ठ नागरिक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. (महिलांच्या बाबतीत २ वर्षांची सूट) जे आयकर भरत नाहीत, त्यांना देशातील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी यामुळे मिळेल.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) कडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नास्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाईड, एकट्या जेष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन आपण राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो.
असे नमूद करताना, त्यांनी मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना लागू करण्यासाठी खर्चाची तरतूद, नियमावली, अंमलबजावणी यंत्रणा, ही योजना लागू करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत आपण तात्काळ आदेश दिल्यास ही योजना महाराष्ट्र राज्यात लागू होऊ शकते. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.