आजारी भावाला खांद्यावर घेऊन त्याची कैक किलोमीटर पायपीट

आजारी भावाला खांद्यावर घेऊन त्याची कैक किलोमीटर पायपीट

मुंबई : बहीण-भावाच्या प्रेमाबद्दल कायमच बोललं जातं. त्याला कवितेचा वा गाण्याचा साज चढवला जातो. मात्र, तुलनेने भावा-भावांमधील नात्याचे अनोखे बंध उलगडण्याचा प्रयत्न फारसा झालेला दिसत नाही... श्रीराम अन् लक्ष्मण यांच्या प्रेमाचे दाखले अनेकदा दिले जातात. कोरोनाच्या संकटात त्याचाच वस्तुपाठ घालून दिलाय, विरारला राहणाऱ्या एका तरुणाने... आजारी भावाच्या उपचारांत अडथळा येऊ नये म्हणून त्याने चक्क त्याला खांद्यावर उचलून घेत विरार ते भाईंदरदरम्यानचा तब्बल 17 किमीचा रेल्वेमार्ग पार केला. तोही रणरणत्या उन्हात... रस्तेमार्गे खासगी वाहनाने जाण्याचा पर्याय त्याच्यासमोर होता. मात्र, आर्थिक स्थिती  बेताचीच असल्याने आणि जागोजागी असलेल्या पोलिस बंदोबस्तापासून वाचण्यासाठी त्याने सुरक्षित अशा रेल्वेमार्गाची निवड केली.

सध्या कोरोनाचं विष फोफावतं आहे. संचारबंदीमुळे अनेक जण घरातच जायबंदी झाले आहेत. संसर्ग वाढू लागल्याने बाहेर पडण्यास कोणी धजावत नाहीय... कुटुंबीयांसोबतच सुख-दुःखाच्या गोष्टींना उजाळा दिला जातोय... भाईंदरला राहणारा रणबीर चौहान मात्र अस्वस्थ होता. विरारला राहणारा त्याचा 55 वर्षांचा चुलत भाऊ संतबीर वैध काही दिवसांपासून आजारी होता. भाईंदरमधील एका रुग्णालयात त्याच्यावर ट्रिटमेंट सुरू होती. डाॅक्टरनी दिलेल्या दिवसांनुसार त्याच्यावर नियमित उपचार सुरू होते. उपचारांची पुढची तारीख होती, 15 एप्रिल.... पण भावाला भाईंदरला आणायचं कसं, असा प्रश्न रणबीरला पडला होता. बांधकाम मजूर म्हणून तो कामाला होता. पण सध्याच्या परिस्थितीत कामही बंद आहे. पोटाची खळगी भरणे मुश्कील असताना खासगी वाहनाने भावाला भाईंदरला आणणं खर्चिक आणि त्रासदायक होतं. संचारबंदीमुळे एखादा गाडीवाला येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. ओळखपाळख फारसी नसल्याने मदतीसाठी जायचे कोणाकडे, अशी समस्याही होतीच. शेवटी रणबीरने निर्धार केला. त्यानेच मोठ्या प्रयत्नांनी विरार गाठलं. भावाला परिस्थितीतची कल्पना दिली. त्याची समजूत काढली. काहीही करून भाईंदरला पोहचू. मी तुला माझ्याकडेच ठेवतो. मग कसलीच चिंता नाही, अशी उमेद त्याच्यात जागवली नि एक गाठोडे उचलून त्यांची पायपीट सुरू झाली. तोंडाला मास्क लावयला ते विसरले नाहीत... सकाळी सात वाजता ते थेट गेले विरार रेल्वेस्थानकात. बाजूच्या मार्गातून त्यांनी रेल्वेपटरी गाठली आणि देवाचं नाव घेत रणबीरची पावलं भाईंदरच्या दिशेने झपाझप पडू लागली. खांद्यावर असलेले संतबीर यांच्या डोळ्यात पाणी तरळले, पण ते होते आनंदाचे... 

कठीण प्रसंगी सग्यासोयऱ्या नात्यांचा चक्काचूर झालेली अनेक प्रकरणं मुंबईने दाखविली आहेत. पण अतूट माणुसकी कोणत्याही नात्याचे बंध अधिकच घट्ट करते... हात-पाय चालवून पैसा कमावणारे रणबीर चौहान आणि संतबीर वैध म्हणूनच वेगळे ठरतात...


भाऊ बरा होईपर्यंत माझ्याकडेच राहणार!
भावाला खांद्यावर उचलून रणबीर चौहान विरार रेल्वेस्थानकातून सकाळी सात वाजता निघाला. मधे मधे थोडा वेळ भाऊ खाली उतरायचा नि रणबीरबरोबर थोडा वेळ चालायचा. तेवढाच रणबीरला थोडा आराम. दोन तासांना नऊ वाजता ते वसई खाडीपुलावर पोहचले. तेव्हा काही छायाचित्रकार तिथे आपलं रुटीन काम करत होते. त्यांची नजर दोघांवर गेली. ते आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून रणबीर थोडा बिथरला. पोलिस तर नाही ना आले, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने लागलीच भावाला खांद्यावरून उतरवले नि परिस्थितीची कल्पना दिली. त्याच्या बंधुप्रेमापुढे कोणाचं काय चालणार होतं का? छायाचित्रकारांनीही त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना मदतीचा हात पुढे केला. मात्र, जिद्दी रणबीरने त्यांचे आभार मानत भावाला पुन्हा खांद्यावर बसवलं. एक एक पाऊल उचलत तो भाईंदरच्या दिशेने निघून गेला... जाताना हरियानवी भाषेत एवढंच म्हणाला, आता भाऊ बरा होईपर्यंत माझ्याकडेच राहणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com