ठाण्यात घागरी फुटल्या, चुली पेटल्या!

रखरखत्या उन्हाच्या तडाख्यात ठाण्यात मंगळवारी पाणीटंचाई आणि इंधन दरवाढीविरोधात झालेल्या दोन वेगवेगळ्या आंदोलनांनी वातावरण आणखी तापले.
thane water and fuel agitation
thane water and fuel agitationsakal
Summary

रखरखत्या उन्हाच्या तडाख्यात ठाण्यात मंगळवारी पाणीटंचाई आणि इंधन दरवाढीविरोधात झालेल्या दोन वेगवेगळ्या आंदोलनांनी वातावरण आणखी तापले.

ठाणे - रखरखत्या उन्हाच्या (Summer) तडाख्यात ठाण्यात मंगळवारी पाणीटंचाई (Water Shortage) आणि इंधन दरवाढीविरोधात (Fuel Rate) झालेल्या दोन वेगवेगळ्या आंदोलनांनी (Agitation) वातावरण आणखी तापले. शहरातील ५० हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या सावरकरनगर, करवालो नगर आणि लोकमान्यनगर येथील रहिवाशांनी राष्ट्रवादीच्या (NCP) नेतृत्वाखाली पाणीटंचाईविरोधात महापालिकेवर मोर्चा काढत मुख्यालयासमोर रिकाम्या घागरी फोडल्या; तर दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीचा निषेध करण्यासाठी दलित पँथरच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्षरशः चूल पेटवून भाकऱ्या भाजल्या.

ठाणे शहरातील सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर या भागामध्ये साधारणपणे ५० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. या भागामध्ये पाण्याचा अनियमित पुरवठा होतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ २ दशलक्ष लिटरची एकच पाण्याची टाकी ठाणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली आहे. शिवाय, अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले पाणी वितरणाचे जाळेही नव्याने विस्तारण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून घागरी फोडल्या.

लोकमान्य नगर बस आगारापासून रणरणत्या उन्हात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पालिका मुख्यालय गाठले. सुरुवातीस अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले. अखेर, पाणीखात्याचे कार्यकारी अभियंता ढोले यांनी पालिका प्रवेशद्वारावर येऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर या भागात पाणी सोडण्याची वेळ निश्चित करावी; पाणीपुरवठ्यामध्ये वाढ करावी, पाणीसमस्या निकाली काढण्यासाठी आणखी जलकुंभ उभारण्यात यावेत, वॉटर सप्लायचे रिमॉडेलिंग करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर ढोले यांनी, ही समस्या निकाली काढण्यासाठी दीड महिन्यात उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. माजी नगरसेवक अमित सरय्या आणि हणमंत जगदाळे हेसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते.

इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन

ठाणे - इंधनाचे दर रोज वाढत असताना जनतेच्या ताटात भाकरी देण्याऐवजी धार्मिकवाद वाढला जात आहे, असा आरोप करत दलित पँथरने केंद्र सरकारच्या विरोधात मंगळवारी आंदोलन केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनकर्त्यांनी तेथेच चूल मांडली आणि भाकऱ्या भाजून इंधन दरवाढीचा निषेध केला.

जीवनावश्यक साहित्य कमालीचे महाग झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करीत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष राम तायडे यांनी केंद्र सरकारचा महागाईविरोधात एल्गार मोर्चा काढून निषेध केला. दलित पँथरचे मोर्चकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. चुलीवर भाकऱ्या भाजून आणि गळ्यात भाज्यांच्या माळा घालून महागाईला नियंत्रित न ठेवल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व युवक अध्यक्ष जयेश बनसोडे, महिला अध्यक्षा सुरेखा गायकवाड आणि शहर, जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com