जलवाहिन्यांच्या गळतीने ठाणेकरांची पळापळ

ठाणे : टँकरने पाणी भरण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : टँकरने पाणी भरण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे :  स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहरातील नागरिकांना सध्या "पाणी पाणी' करण्याची वेळ आली आहे. इतर वेळी एप्रिल महिन्यानंतर ठाण्यातील नागरिकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागते. मात्र, यंदा ऐन हिवाळ्यात जलवाहिनीतील गळतीमुळे शहरातील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.

शहरातील चरई, टेंभी नाका आदी परिसरासह घोडबंदर येथील बहुतांशी परिसरातील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे अनियमित पाणीपुरवठा होत असताना पाण्याचा वेळाही अनेक वेळा परस्पर बदलल्या जात असल्याने अनेक गृसंकुलात पाणी नक्की कोणत्या वेळी मुख्य टाकीत सोडायचे यावरून सदस्यांमध्ये वादविवाद वाढलेले आहेत. 

ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी 1300 मीमी व्यासाच्या पिसे धरणावरून येणाऱ्या जलवाहिनीला भिवंडीतील रांजणोली नाक्‍याजवळ मुख्य द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना फटका बसला. त्यामुळे तेथून गळती सुरू झाली आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या खालून जात असल्याने त्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला तत्काळ मिळाली नव्हती. पाणी गळती शोधणारे डिटेक्‍टर आणून या जलवाहिनीला कुठे गळती आहे, याची माहिती घेण्यात आली. 

त्यानुसार आता या जलवाहनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर दोन दिवसात म्हणजेच शुक्रवारी (ता. 31) शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्‍यता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने ठाण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावले नाही. विविध धरणातून महापालिकेला आजच्या घडीला 485 लाख लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाणीपुरवठा होत असताना जलवाहिनीत वारंवार होत असलेल्या गळतीमुळे ठाण्यातील नागरिकांना "पाणी पाणी' करण्याची वेळ आली आहे. 

मुख्य शहरातील नौपाडा, चरई, सिद्धेश्वर टाकीवरून ज्या-ज्या भागांना पाणी पुरवठा होतो, त्या परिसरासह शहरातील इतर भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सध्या कोलमडले आहे. घोडबंदर भागातील कासारवडवली, ब्रह्मांड, वाघबीळ, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा आदी परिसरातही अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून रात्री उशीरा पाणीपुरवठा केला जात असल्याने जागरण करून पाणी साठविण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आली आहे. 

पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले 
ठाणे शहराला सध्या पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सातत्याने केला जातो. तसेच महापालिकेला मिळत असलेल्या सुमारे 485 लाख लीटर पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जात असल्याचा डंका वारंवार पिटला जातो. पण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून ठाण्यातील मुख्य शहरासह घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com