चित्रपटगृहे सुरू; पण आर्थिक घडी सावरणे कठीण; देशभरात नऊ हजार कोटींचे नुकसान

चित्रपटगृहे
चित्रपटगृहे

मुंबई ः केंद्र सरकारने 15 ऑक्‍टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी आतापर्यंत गेल्या सात महिन्यांत चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला आहे. देशातील चित्रपटगृहांचा विचार करता अंदाजे नऊ हजार कोटी, तर राज्यातील अंदाजे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूणच ही बिघडलेली आर्थिक घडी सावरणे कठीण आहे. त्यातच सरकारने 50 टक्केच उपस्थितीसाठी परवानगी दिली असल्यामुळे किती प्रेक्षक येतील आणि किती नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे चित्रपटगृहे सुरू झाली तरी अर्थकारणाची घडी सावरणे कठीण बाब आहे.

लॉकडाऊनमध्ये मानसिक समस्यांमध्ये वाढ
 
देशात मल्टिप्लेक्‍सची साखळी मोठी असली तरी सिंगल स्क्रीनची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. आता तर ही संख्या अधिक घटणार आहे; शिवाय काही सिंगल स्क्रीन पुन्हा उभी राहतील की नाही, अशी शंका आहे. कोरोनाचा फटका मल्टिप्लेक्‍स तसेच सिंगल स्क्रीनला मोठा बसला आहे. राज्यात कार्निव्हल, पीव्हीआर, मिराज, सिनेपोलिस, आयनॉक्‍स अशी काही मल्टिप्लेक्‍सची साखळी आहे. जवळपास तीन-चार हजार स्क्रीन्स आहेत. सिंगल स्क्रीनची संख्या राज्यात चारशेच्या आसपास आहे. त्यामुळे सरकारने चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली तरी हा व्यवसाय सावरणे आता कठीण झाले आहे. 

गेल्या सात महिन्यांत खूप नुकसान झाले आहे. विजेचे बिल, कामगारांचा पगार, सरकारचे विविध कर तसेच अन्य खर्च भागविता भागविता आमच्या नाकीनऊ आलेले आहेत. त्यातच आता चित्रपटगृहे जरी सुरू झाली तरी प्रेक्षक किती येतील हा प्रश्‍न आहे. त्यामुळे हा व्यवसाय सावरण्यास काही कालावधी लागेल. 
- प्रकाश चाफळकर, सचिव, मल्टिप्लेक्‍स असोसिएशन 

जवळपास तीन-चार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हे नुकसान आता भरून येणे कठीण आहे; मात्र आता दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना राज्य सरकारने थिएटर्स सुरू करण्यास परवानगी देणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र हे चित्रपटसृष्टीच्या व्यवसायासाठी महत्त्वाचे राज्य आहे. एकूणच होणारा व्यवसाय पाहता त्यात महाराष्ट्राचा वाटा अधिक असतो आणि त्यानंतर दिल्लीचा. त्यामुळे प्रेक्षक येतील की नाही, व्यवसाय किती होईल याचा विचार न करता चित्रपटगृहे उघडणे आवश्‍यक आहे आणि सरकारला महसूलही अधिक मिळेल. 
- नितीन दातार, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स अँड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया 

चित्रपटगृहे सुरू झाली की जुने आमीर खान, शाहरूख खान यांचे चित्रपट लावले जातील. कारण आता बहुतेक नवीन चित्रपट ओटीटीवर गेले आहेत. 
- समीर दीक्षित, वितरक

(संपादन- बापू सावंत)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com