निसर्गग्रस्तांची अद्यापही भरपाईसाठी वणवण; प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजीचे सूर

निसर्गग्रस्तांची अद्यापही भरपाईसाठी वणवण; प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजीचे सूर

अलिबाग : चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील वादळग्रस्तांनी अलिबाग तहसील कार्यालयात धाव घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या तहसील कार्यालयातील तक्रार निवारण कक्षामध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. सुमारे साडेतीन हजारांपेक्षा अधिक नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. 

3 जूनच्या चक्रीवादळात जिल्ह्यातील वित्तहानीबरोबरच काही प्रमाणात जीवितहानीही झाली. नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी म्हणून प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निधी वर्गही करण्यात आला. तहसील कार्यालयाकडून नुकसानग्रस्तांच्या थेट खात्यामध्ये आर्थिक मदत वर्ग करण्यात आली. निम्म्याहून अधिक नागरिकांना त्यांच्या नुकसानीची भरपाईही मिळाली; परंतु तालुक्यातील महाजने, रामराज, बामणगाव, रेवदंडा, चौल, खानाव परिसरातील काही नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यात ज्यांचे नुकसान झाले नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई वर्ग केली आहे. परंतु ज्यांचे प्रत्यक्षात नुकसान झाले त्यांना भरपाई दिली नसल्याचा आरोप नुकसानग्रस्तांनी केला. 

तीन महिने होऊनही काही नागरिक भरपाईपासून वंचित राहिले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली असता, तहसील कार्यालयातून माहिती मिळेल, असे सांगून त्यांच्याकडील जबाबदारी ते ढकलत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयात भरपाईसाठी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. 
अलिबाग तहसील कार्यालयाच्या आवारात चक्रीवादळ मदत तक्रार निवारण कक्ष उभारले आहे. या तक्रार निवारण कक्षात नुकसानग्रस्तांच्या भरपाईची माहिती घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. 

दाद कोणाकडे मागायची?
ज्येष्ठ नागरिकही तहसील कार्यालयात पायपीट करत आहेत. मात्र, त्यांनाही भरपाई मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खात्यामध्ये पैसे वर्ग केल्याचे सांगून तहसील कार्यालयातील मंडळी त्यांची जबाबदारी झटकत आहेत. तर बँकेतील कर्मचारी पैसेच आले नाहीत, असे सांगत आहेत. या प्रकारामुळे निसर्गग्रस्तांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

चक्रीवादळात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भरपाई तातडीने मिळेल, या आशेने ग्रामपंचायतीकडे बँक खाते नंबर दिला; परंतु तीन महिन्यांपासून तहसील कार्यालयात पायपीट करत आहे. मात्र, कोणाकडूनही सहकार्य मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना योग्य वागणूक दिली जात नाही. 
- उल्हास कुंटे,
कुंठ्याची गोठी, नुकसानग्रस्त 

अलिबाग तालुक्यात नुकसानग्रस्तांना भरपाईचे वाटप केले आहे. त्यातील काहींच्या त्रुटी बँकांनी काढल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहे. या कक्षामार्फत नुकसानग्रस्तांचे प्रश्न सोडवून लवकरच त्यांना भरपाई देण्याचे काम केले जाईल. 
- सचिन शेजाळ,
तहसीलदार, अलिबाग 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com