
गिरणी कामगारांची सोडत रखडली
मुंबई, ता. ४ : एमएमआरडीएच्या घरांची सोडत काढण्याची मागणी गिरणी कामगार संघटनांकडून झाल्याने म्हाडाने त्यासाठीची तयारी केली होती. मात्र, एमएमआरडीएकडून घरे प्राप्त न झाल्याने गिरणी कामगारांची सोडत लांबणीवर गेली आहे. एमएमआरडीएकडून घरांची माहिती मिळताच सोडत काढण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पनवेल कोन येथील भाडेतत्त्वावरील योजनेसाठी उभारलेली घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर म्हाडामार्फत २०१६ मध्ये २ हजार ४१७ घरांची सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर म्हाडाने काही पात्र कामगारांकडून घराची संपूर्ण रक्कम घेतली आहे. मात्र, घराचा ताबा अद्याप रहिवाशांना मिळालेला नाही. यातच या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्यांना मुंबईत घर देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, त्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेऊन घराची रक्कम भरलेल्या कामगारांना घरे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा कामगारांना पनवेल येथील घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हाडा उपाध्यक्षांनी सोडत काढण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, या सोडतीसाठी आवश्यक असलेली घरांची माहिती एमएमआरडीएकडून मिळालेली नाही. त्यामुळे म्हाडाला सोडत काढता आली नाही. एमएमआरडीएकडून घरे प्राप्त होताच सोडत काढण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..