सुरगडावरील अवशेष झाले पुनरुज्जीवित
दुर्गवीर प्रतिष्ठानची संवर्धन, स्वच्छता मोहीम फत्ते
पाली, ता. ३१ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील खांब गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच संवर्धन व स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी सुरगडावरील एका सदरेला पुनरुज्जीवित करून चौथरा उजेडात आणण्यात आला.
प्रतिष्ठानने राबवलेल्या मोहिमेत गडावरील परिसरात वाढलेले गवत, झाडी काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. गडावरील सदरेचे अस्ताव्यस्त पडलेले दगड व्यवस्थित ठेवून त्याला पुनरुज्जीवित केले गेले. जेणेकरून नवीन पर्यटकांना येथे सदर होती हे लक्षात येईल. हे काम खूप महत्त्वाचे असते. कारण काळाच्या ओघात या वास्तू जमिनीखाली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे योग्य पद्धतीने उत्खनन करून त्यांना मोकळे करावे लागते. तेच काम या मोहिमेत करण्यात आले. त्याचबरोबर गडाच्या मागील बाजूला कातळात कोरलेले एक भुयारही निदर्शनास आले. भविष्यात ते साफ करण्याचा दुर्गवीरचा मानस आहे. या सुरगड मोहिमेत एकनाथ अस्वले, अमित शिंदे, स्वप्नील चेंबूरकर, सुरेश उंडरे, सुमित जाधव, अमित जाधव, विशाल बामणे, प्रतिक इंदुलकर, जयवंत कोळी, अजित राणे, प्रतिक पाटेकर व किशोर असे एकूण १२ शिलेदार सहभागी झाले होते.
सातत्याने संवर्धन
दुर्गवीर प्रतिष्ठान दहा वर्षांहून अधिक काळापासून किल्ल्यावर संवर्धन व स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यामध्ये गडावरील अनेक पाण्याची मोठ्या टाक्या, पायवाटा, अनेक लुप्त झालेल्या वास्तू, सदरे, चौथरे दुर्गवीरांनी स्वच्छ करून उजेडात आणल्या आहेत. याशिवाय माहिती फलकही बसवले आहेत.
--------------------
गडावरील कामे ही कधीच न संपणारी आहेत. भविष्यात या गडावर मोठे काम हाती घेणार आहोत. त्यासाठी आम्हाला अनेकांची साथ हवी आहे. गडाच्या घेऱ्यातील तरुणांना आमचे आवाहन आहे की, त्यांनी या कामात सहभाग नोंदवावा आणि गडकिल्ल्यांचा इतिहास जपण्यासाठी पुढे यावे.
- अजित राणे, सदस्य, दुर्गवीर प्रतिष्ठान
पाली : सुरगडावर संवर्धन करताना दुर्गवीरचे शिलेदार.
पाली : सुरगड संवर्धन व स्वच्छता मोहिमेत सहभागी दुर्गवीरचे शिलेदार.