अमृता फडणवीस यांना
विरोधी पक्षनेते करावे का?
महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : शिवसेना-भाजपमधील शाब्दिक युद्ध आता किचन कॅबिनेटपर्यंत पोहचले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासंदर्भात विधान केले. त्याला शिवसेनेकडूनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख प्रत्युत्तर दिले. महिलांचे हनन करणे ही हिंदू संस्कृती नाही; मात्र वारंवार असे प्रकार होत राहिल्यास नाईलाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी लागेल, असा इशाराही महापौरांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद सोडल्यास ते पत्नी रश्मी ठाकरे किंवा पुत्र आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करतील, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याला महापौर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी समाज माध्यमांवर सक्रिय असतात म्हणून त्यांना विरोधी पक्षनेते करायचे का, असा प्रश्न महापौरांनी पाटील यांना विचारला.
महापौर म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. भाजपकडून सातत्याने महिलांचे हनन होत आहे. हिंदू धर्माची ही शिकवण नाही. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही, ते सहनही केले जाणार नाही. हे नेते असेच बोलत राहिल्यास आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटावे लागेल, असा इशाराही महापौरांनी दिला.
-----
विनाकारण धार्मिक तेढ नको!
भायखळा येथील राणीच्या बागेतील हजरत हाजी पीर बाबा राणीबाग असे लिहिलेल्या कोनशिलेचे छायाचित्र समाज माध्यमांवर पसरले होते. त्यावरून शिवसेनेवर टीकाही केली जात होती; मात्र ही कोनशीला पूर्वीपासून आहे. जवळपास १५० वर्षांपासून हे नाव त्या ठिकाणाला आहे. विनाकारण धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे, असेही महापौरांनी सांगितले.