गोळीबार नगरातील रहिवाशांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
१५ दिवसांत मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार रोडवरील झोपड्यांचा पुनर्विकास प्रकल्प शिवालिक व्हेंचर्स या विकासकाने रखडवला आहे. यामुळे झोपडीधारकांची फरफट होऊ लागल्याने गोळीबार झोपडपट्टी पुनर्वसन संयुक्त कृती समितीच्या वतीने रहिवाशांनी गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी रहिवाशांच्या मागण्यांबाबत येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेऊन मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
सांताक्रूझ येथील गोळीबार रोड येथील शेकडो झोपड्यांचा पुनर्विकास २००८ पासून शिवालिक डेव्हलपर्सकडून हाती घेण्यात आला. त्यानुसार विकासकाने काही रहिवाशांचे पुनर्वसन केले आहे. मात्र इतर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे. विकासकाने प्रकल्प राबविण्यासाठी काही रहिवाशांच्या तात्पुरत्या वास्तव्यासाठी याच परिसरात संक्रमण शिबिर उभारले. हे शिबिर धोकादायक झाले असले तरी त्याच घरांमध्ये नागरिकांना वास्तव्य करावे लागत आहे. त्याचप्रमाणे विकासकाने रहिवाशांना पर्यायी वास्तव्याचे भाडेही दिलेले नाही. याबाबत रहिवाशांनी एसआरए अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रहिवाशी आक्रमक झाले आहेत. सरकारने विकासकाची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गोळीबार झोपडपट्टी पुनर्वसन संयुक्त कृती समितीने बुधवार (ता.२२) पासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. अखेर तिसऱ्या दिवशी रहिवाशांना ठोस आश्वासन दिल्याने रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले आहे. १० जानेवारीपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास १० जानेवारी २०२२ पासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.