३ जानेवारीपासून ‘सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचाम’ अभियान
शिक्षण विभागाचा जीआर, प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यक्रम
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदरम्यानच्या काळात यंदा शालेय शिक्षण विभागातर्फे ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राज्यात राबवले जाणार आहे. त्यासाठी आज शिक्षण विभागाने जीआर जारी केला आहे.
‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २९) ‘लेक शिकवा’ अभियान यंदा तरी राबवणार? अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेत आज ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ हे अभियान राबविण्याबाबतचा जीआर काढण्यात आला. या जीआरनुसार राज्यातील प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.
सात वर्षांपासून शालेय शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जयंतीपासून २६ जानेवारी या कालावधीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान’ राबवले जात होते. त्याचे नाव बदलून आता ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र, या लेक शिकवा आणि त्यातून शाळाबाह्य मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासत हे अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित करण्यात आल्याने यावर शिक्षण तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या महामारीनंतर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलींची शाळा सुटली. यामुळेच बालविवाह मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने शाळाबाह्य मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे नवीन अभियान आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, समर्थन संस्थेचे शिक्षण प्रमुख रुपेश कीर, सिस्कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
--
कोट..
राज्यातील शाळांमध्ये आता ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी आज जीआर जारी करण्यात आला आहे. यात शाळाबाह्य मुलींचा शोध घेणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अशा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर नव्याने विचार केला जाईल.
- राजेंद्र पवार, सहसचिव, शालेय शिक्षण.
--
नवीन अभियानाचे उद्देश
- राज्यातील शाळांमध्ये प्रबोधन, स्पर्धा, संवाद आणि त्यासोबत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
- जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.
- शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे.