टंकलेखनसाठी `खानविलकर गुणदान पद्धती’ अमलात आणा!
राज्यातील हजारो संगणक टंकलेखन संस्थांची सरकारकडे मागणी
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) : राज्यात टंकलेखन (टायपिंग) व संगणक टंकलेखनचे प्रशिक्षण देणाऱ्या मान्यताप्राप्त सुमारे पाच हजार शिक्षण संस्था कार्यरत आहेत. २०१७ पासून एक एजन्सी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टंकलेखनाच्या सर्व परीक्षांचे नियोजन करते. दरवर्षी परीक्षा झाल्यावर निकाल लागण्यास किमान दोन महिने लागतात. मात्र अजूनही निकाल जाहीर झालेला नसल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे टंकलेखना साठी खानविलकर समितीच्या गुणपद्धतीची अंमलबजावणी करण्याची मागणी संस्थाचालकांकडून केली जात आहे.
राज्य सरकरतर्फे शिक्षणतज्ज्ञ व भांडुपमधील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली टंकलेखन परीक्षेच्या गुणपद्धतीत सुधारणा करण्यासाठी `खानविलकर समिती`ची नेमणूक करण्यात आली होती. भविष्यात एजन्सीला परीक्षा घोटाळा करता येऊ नये म्हणून या समितीने २०१४ मध्ये संगणक परीक्षा गुणपद्धती नव्याने सुचविली होती; परंतु गेल्या सहा वर्षांपासून त्याबाबतचा प्रस्ताव सरकार स्तरावर प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थाचालकांनी `खानविलकर समिती गुणदान पद्धती’ची अंमलबजावणी तात्काळ करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
निकालाची प्रतीक्षा
राज्यातील सुमारे पाच हजार संस्थांच्या माध्यमातून किमान पाच लाख विद्यार्थी वर्षातून दोनदा टंकलेखनाची परीक्षा देतात. परीक्षेचे प्रमाणपत्र सरकारी पद भरतीत आवश्यक असते. त्यामुळे या परीक्षेत सुद्धा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या जी.सी. सी. व टी. बी. सी. परीक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नसून, गेली दोन महिने संस्था चालक व विद्यार्थी या निकालाची प्रतीक्षा करत आहेत.