शाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना टॅब
दहावीबाबत महापालिकेचे वरातीमागून घोडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मार्च महिन्यात दहावीची बोर्डाची परीक्षा होणार असून येत्या काही दिवसांत पूर्वपरीक्षाही सुरू होणार आहे. तसेच, दहावीचे वर्गही आता संपत आलेले आहेत; मात्र विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांच्यासाठी टॅब खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने उशिरा घेतला आहे. आता कार्यादेश मिळाल्यानंतर तब्बल दोन ते अडीच महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात टॅब पडणार आहे. म्हणजेच तोपर्यंत दहावीची परीक्षाही संपलेली असेल.
महापालिका प्रत्येक टॅबसाठी २० हजार ५३२ रुपये असे एकूण तब्बल ३९ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याबरोबरच शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून महापालिकेने २०२१-२२ या वर्षात दहावीच्या सर्व चार माध्यमातील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता टॅबखरेदी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव बुधवारी (ता. ५) होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. या टॅबमध्ये मराठीसह उर्दू, हिंदी, इंग्रजी या चार भाषांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याला बालभारतीची मान्यताही असेल. प्रत्येक टॅबसाठी महापालिका करासह २० हजार ५३२ रुपयांचा खर्च करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी केली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही संबंधित पुरवठादारावर सोपवण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षासाठी ही खरेदी करण्यात येत आहे; मात्र आता दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार असून आता पूर्वपरीक्षेची वेळही आली आहे. एड्युसपार्क इंटरनॅशनल प्रा. लि. ही कंपनी हे टॅब पुरवणार आहे. एक वर्षाच्या हमीबरोबरच पालिकेने चार वर्षांची जादा हमी या टॅबची घेतली आहे.
महापालिकेच्या कंत्राटातील अटीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे टॅब ६० दिवसांत आणि हिंदी, उर्दू माध्यमाचे टॅब ७५ दिवसांत पुरवायचे आहेत. तोपर्यंत दहावीच्या परीक्षाही संपणार असून हे टॅब आता सुट्टी काळात धुळखात पडणार आहेत.
-----
निविदाच विलंबाने
वर्षभर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना टॅबची सर्वाधिक गरज होती; मात्र महापालिकेतर्फे टॅबच्या खरेदीसाठी ऑगस्ट महिन्यात निविदा मागवण्यात आल्या. पुरेसा प्रतिसाद मिळावा म्हणून चार वेळा निविदांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडली. आता निविदा प्रक्रिया जाहीर करून तब्बल चार महिन्यांनंतर स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
२२ हजार टॅब गेले कुठे?
महापालिकेने यापूर्वी २०१५ मध्ये विद्यार्थ्यांसाठी तब्बल २२ हजार टॅब घेतले होते. या योजनेचा माठा गाजावाजाही झाला होता. मात्र नंतर हे टॅब नामशेष झाले. त्याचा ठावठिकाणाही लागू शकला नाही.